समर्थ लॉ महाविद्यालयात विद्यार्थी स्वागत व गुणगौरव समारंभ संपन्न
1 min readबेल्हे दि.१४:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ लॉ कॉलेज बेल्हे येथे प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे स्वागत व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन कार्यकारिणीचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदिप जगताप,ॲडव्होकेट सचिन चव्हाण,सचिव ॲडव्होकेट गणेश भालेराव,ॲडव्होकेट सुधीर कोकाटे,लेखा परीक्षक ॲडव्होकेट संजय उंडे,सदस्य ॲडव्होकेट गणेश आल्हाट तसेच अतिरिक्त सरकारी वकील ॲडव्होकेट गोकुळ खोडे मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन चे मा.उपाध्यक्ष व समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्युट चे सल्लगार ॲडव्होकेट सुधीर कोकाटे यांनी सर्व कार्यकारिणी मंडळातील सदस्यांची ओळख करून दिली.
जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन चे उपाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप जगताप यांनी विद्यार्थ्यांना लॉ अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर उपलब्ध असणाऱ्या विविध संधींचे मार्गदर्शन केले.उपाध्यक्ष ॲडव्होकेट सचिन चव्हाण विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना करताना म्हणाले की हे लॉ कॉलेज जुन्नर तालुक्यातील एकमेव महाविद्यालय असून आपल्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.
कोर्टासमोर युक्तिवाद करताना व्यावसायिक व नैतिक मूल्ये महत्त्वाची असून आपले संभाषण कौशल्य आणि आत्मविश्वास याच गोष्टी यश मिळवून देतात.चौकस बुद्धी ठेवून काम करायला हवे.प्रत्येक गोष्टीचे ज्ञान हे अपडेट करायला हवे.विद्यार्थ्यांना वेळोवेळी लागणारे मार्गदर्शन किंवा केस स्टडी साठी असोसिएशन च्या माध्यमातून सदैव सहकार्य करू.या महाविद्यालयातून खऱ्या अर्थाने वकील घडतील व संस्थेचे नाव उज्ज्वल करतील असा आशावाद यावेळी व्यक्त केला.
अतिरिक्त सरकारी वकील ॲडव्होकेट गोकुळ खोडे म्हणाले की विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धा किंवा अन्य स्पर्धांमध्ये हिरीरीने सहभाग घेतला पाहिजे.वकिली क्षेत्र हे ज्ञानाचे क्षेत्र आहेत.ज्ञानानेच सिद्ध करावे लागतं की मी वकील आहे.यापूर्वी देखील अनेक वकिलांनी देशाचे,राष्ट्राचे नेतृत्व केले आहे.न्याय ही राष्ट्राची प्रतिष्ठा आहे.चांगले विचार हे चांगल्या मेंदूमध्ये येतात आणि चांगला मेंदू हे सुदृढ शरीराचे लक्षण आहे.
विद्यार्थ्यांनी भौतिक आणि बौद्धिक मूल्यमापन करणे गरजेचे आहे.त्यासाठी अविरत व अव्याहतपणे वाचन तितकेच महत्त्वाचे आहे.युक्तिवाद आणि निरीक्षण या दोन गोष्टी आत्मसात करून घ्या.वकील होण्यासाठी आपली नजर चतुरस्त्र हवी.जुन्नर तालुका वकील बार असोसिएशनचे उपाध्यक्ष संदिप जगताप, सदस्य ॲडव्होकेट गणेश आल्हाट यांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना करियरच्या दृष्टिकोनातून बहुमोल असे मार्गदर्शन केले व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
संस्थेच्या वतीने जुन्नर तालुका वकील बार असोसिएशन कार्यकारिणी मंडळातील उपस्थित पदाधिकाऱ्यांचा शाल व सन्मान चिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.यावेळी प्रथम वर्ष प्रवेशित विद्यार्थ्यांचे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये शाल व भेटवस्तू देऊ स्वागत करण्यात आले.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत घेण्यात आलेल्या परीक्षांमध्ये प्रथम व द्वितीय वर्षामध्ये प्रथम तीन क्रमांक मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. तसेच वाचन प्रेरणा दिनाच्या अनुषंगाने ग्रंथ प्रदर्शन,वक्तृत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धा उत्कृष्ट विचार प्रगटन स्पर्धा यामध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा देखील मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.
संस्थेचे अध्यक्ष वसंतराव शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके,सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके,लॉ कॉलेज चे प्राचार्य डॉ.सुनील कवडे,उपप्राचार्य प्रा.प्रकाश कडलग,कॅम्पस डायरेक्टर प्रा.राजीव सावंत,बीसीएस चे डॉ.लक्ष्मण घोलप,पॉलिटेक्निक चे प्राचार्य अनिल कपिले,क्रीडा संचालक एच पी नरसुडे,प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर आदी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा.इम्रान शेख,प्रा.पूनम वाघ,प्रा.कविता वामन,प्रा.महेंद्र खरात,प्रा.नितीन गायकवाड यांनी प्रयत्न केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक लॉ कॉलेज चे प्राचार्य डॉ.सुनील कवडे यांनी,सूत्रसंचालन प्रा.प्रदीप गाडेकर यांनी तर आभार प्रा.आश्विनी जगताप यांनी मानले.