समर्थ गुरुकुल च्या चिमुकल्यांनी बनवल्या हस्त निर्मित राख्या; वृक्षांना राखी बांधून दिला पर्यावरण संवर्धनाचा संदेश
1 min readबेल्हे दि.३०:- समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ गुरुकुल बेल्हे (ता.जुन्नर) या सीबीएसई मान्यताप्राप्त इंग्रजी माध्यमाच्या शाळेत रक्षाबंधन एका वेगळ्या स्वरूपात साजरे करण्यात आले.भारतीय संस्कृती ही रक्षण आणि संरक्षण या दोन घटकांवर आधारलेली आहे आणि त्यासाठी निसर्ग हाच आमचा रक्षणकर्ता आणि पाठीराखा असल्याचे सांगत चिमुकल्यांनी संकुलात असलेल्या विविध झाडांना आणि वृक्षांना राखी बांधून रक्षाबंधन साजरे केले.गुरुकुल च्या १ ली ते १० वी च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन राखी बनवण्याचे साहित्य गोळा केले.उपलब्ध असलेल्या साहित्यातून पर्यावरण पूरक राखी निर्मिती करण्याची कार्यशाळा उत्साहात संपन्न झाली.या कार्यशाळेमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याने दोन राख्या तयार होतील एवढे साहित्य स्वतः घरून आणलेले होते.त्यामध्ये विविध प्रकारच्या रंगीबेरंगी कागदांचा,फुलांचा तसेच सुबक आशा विविध आकारांच्या साहित्य शैलीचा अविष्कार या विद्यार्थीनिर्मित राखी प्रदर्शनामध्ये दिसून आला.या सर्व साहित्यांच्या आधारे बनवलेल्या राख्या अतिशय गोंडस तर दिसतच होत्या, त्याचबरोबर बहिणीचा भावाप्रती आणि भावाचा बहिणी प्रति असलेला आदर त्या राख्यांच्या शैलीतून दिसत होता.वृक्षाना राखी बांधण्यामागे कृतज्ञतेची भावना दिसून आली.वृक्ष आपल्यासाठी बहू उपयोगी आहेत.ते आपल्याला सावली देतात.फळं,फुले देतात.विद्यार्थ्यांनी बनवलेल्या या राख्या शाळेतील मुलांना रक्षाबंधना निमित्त बांधण्यात येणार असून या कार्यशाळेमध्ये कलाशिक्षिका दीप्ती चव्हाण व सर्व शिक्षकांनी सहभाग घेऊन विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.यावेळी संस्थेचे अध्यक्ष वसंत शेळके,उपाध्यक्ष माऊली शेळके, सचिव विवेक शेळके,विश्वस्त वल्लभ शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्या स्नेहल शेळके,प्राचार्य सतिश कुऱ्हे, क्रीडा संचालक एच पी नरसुडे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.