देशात दोन टप्प्यात होणार जातनिहाय जनगणना
1 min read
नवीदिल्ली दि.५:- देशातील जातनिहाय जनगणनेसंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर करण्यात आली आहे. भारतात जातनिहाय जनगणना दोन टप्प्यात केली जाणार आहे. पहिला टप्पा १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल आणि दुसरा टप्पा १ मार्च २०२७ पासून सुरू होईल. विरोधीपक्षाकडून गेल्या अनेक वर्षांपासून जातनिहाय जनगणनेची मागणी केली जात होती. अखेर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेची तारीख जाहीर केली आहे. भारतामध्ये पहिल्या टप्प्यातील जातनिहाय जनगणना १ ऑक्टोबर २०२६ पासून सुरू होईल. पहिल्या टप्प्यात चार राज्यांचा समावेश असणार आहे.
यामध्ये उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, लडाख आणि जम्मू-काश्मीर यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील जातनिहाय जनगणना १ मार्च २०२७ पासून देशाच्या उर्वरीत भागात सुरू होईल. केंद्र सरकारकडून जातनिहाय जनगणनेची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
देशात या अगोदरची जनजगणना काँग्रेस सरकार असताना झाली होती. सन 2011 मध्ये देशात जनगणना झाली, त्यानंतर 2021 मध्ये जनगणना होणे अपेक्षित होते. मात्र, देशभरात कोरोनाची महामारी असल्याने 2021 मध्ये जनगणना घेण्याचा निर्णय झाला नाही.
त्यामुळे, आता 2027 पासून जनगणनेला सुरुवात होत असल्याने तब्बल 16 वर्षांनी जनगणना होत आहे.
जनगणना करण्याची तारीख समोर आली असून देशात 1 मार्च 2027 पासून जनगणनेला सुरुवात होणार आहे. देशभरात दोन टप्प्यात ही जनगणना केली जाणार असून. डोंगरी भागात म्हणजेच लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड येथून सुरुवात होणार आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, तसेच केंद्रशासित प्रदेश जम्मू-काश्मीर आणि लडाख या भागांत विशेष बाब म्हणून 1 ऑक्टोबर 2026 ला जनगणना सुरू होणार आहे.
दरम्यान, जनगणना दर 10 वर्षांनी घेतली जावी, अशी कायदेशीर तरतूद आहे. मात्र, केंद्र सरकारने नुकतेच जनगणना घेण्यासंदर्भात माहिती दिली होती. त्यामध्ये, जातनिहाय जनगणना घेण्यात येणार असल्याचेही केंद्राने स्पष्ट केले होते.
देशात आगामी बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतल्याची टीका विरोधकांकडून करण्यात आली.