सुपा टोलनाक्यावर ३० कोटी चे सोने जप्त

1 min read

पारनेर दि.१:- विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नगर-पुणे महामार्गावरील सुपे टोलनाक्यावर तैनात असलेल्या पथकाने गुरुवारी केलेल्या एका कारवाईत कोट्यवधी रुपयांचे सोने आणि तब्बल ४० किलो वजनाची चांदीची वीट जप्त केली आहे. तसेच कारवाईत सापडलेल्या सोन्याची रात्री उशिरापर्यंत मोजदाद सुरू होती. हे सोने सुमारे २५ ते ३० कोटी रुपयांचे असण्याची प्राथमिक माहिती समजते. या प्रकारची माहिती तपासणी पथकाने निवडणूक आचारसंहिता कक्षाला कळल्यानंतर आचारसंहिता कक्षाच्या प्रमुखांनी ही बाब आयकर विभागाला तसेच सुपा पोलिसांना कळवली. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, गुरुवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास पुण्यावरून अहिल्यानगरकडे जाणारे बीव्हीसी लॉजिस्टिक्स कंपनीचे काळ्या रंगाचे बंदिस्त पीकअप वाहन तपासणी पथकाने तपासणीसाठी थांबवले. या वाहनाची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर सोने तसेच चांदीची ४० किलोची वीट आढळून आली. वाहनासोबत असलेल्या वाहतूक कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडे मौल्यवान वस्तूंची वाहतूक करण्याचा परवाना नव्हता. तसेच त्यांच्याकडे असलेल्या वाहतुकीच्या पावत्या व प्रत्यक्षात असलेले सोने यांचा हिशेब जुळत नव्हता. तसेच वाहनात सापडलेल्या सोन्याबाबत समाधानकारक माहिती मिळत नसल्याने. तपासणी पथक प्रमुख माधव गाजरे यांनी या प्रकाराची माहिती आचारसंहिता कक्ष प्रमुख दयानंद पवार यांना कळवली. त्यानंतर आयकर विभाग तसेच पोलिसांना माहिती देण्यात आली. संध्याकाळी सात वाजेपर्यंत तब्बल १० कोटी रुपये किमतीच्या सोन्याची मोजदाद झाली असल्याचे सांगण्यात आले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे