टीम इंडिया पुन्हा चॅम्पियन; तिसऱ्यांदा जिंकला टी-२० विश्वचषक
1 min read
अहमदाबाद दि.९:- टीम इंडियाने टी-20 वर्ल्ड कपमध्ये पुन्हा एकदा इतिहास रचत विश्वविजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या विजयासह भारताने सलग दुसऱ्यांदा टी-20 विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम केला असून एकूण तिसऱ्यांदा ही प्रतिष्ठेची ट्रॉफी आपल्या नावावर केली आहे. या ऐतिहासिक कामगिरीमुळे भारत असा पराक्रम करणारा पहिलाच संघ ठरला आहे.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने न्यूझीलंडचा 56 धावांनी पराभव करत विश्वचषकावर आपले नाव कोरले. यासह पुन्हा एकदा क्रिकेटविश्वावर आपला दबदबा सिद्ध केला. भारताने यापूर्वी 2007 साली कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली पहिला टी-20 विश्वचषक जिंकला होता.
त्यानंतर तब्बल 17 वर्षांनी 2024 मध्ये रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताने पुन्हा एकदा हा किताब पटकावला. आता 2026 मध्ये सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने टी-20 विश्वचषक जिंकत इतिहासात लिहिला. तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकणारा भारत पहिलाच देश ठरला.
तर घरच्या मैदानावर टी-20 वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला. सलग दोन वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा पहिलाच देश ठरला. म्हणजे टी-20 विश्वचषक जिंकलाच नाही तर त्यासोबतच भारतीय संघाने इतिहास रचला. अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि इशान किशन यांच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारताने 255 धावांचा मोठा
आकडा उभारला आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी 256 धावांचे लक्ष्य ठेवले. अभिषेक आणि संजू यांनी केवळ 7.1 षटकांत 98 धावांची सलामी भागीदारी करत टीम इंडियाला चांगली सुरुवात दिली. टीम इंडियाने आयसीसी टी20 विश्वचषक फायनलच्या इतिहासातील सर्वोच्च धावसंख्या नोंदवली.
अभिषेकने 21 चेंडूत 52 धावा, संजू सॅमसनने 47 चेंडूत 89 धावा आणि इशान किशनने 25 चेंडूत 54 धावा केल्या. शेवटी दुबेने 8 चेंडूत 26 धावा केल्या. न्यूझीलंडचा कर्णधार मिशेल सँटनरने नाणेफेक जिंकली आणि भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
भारतीय संघाने सामन्यात कोणताही बदल केला नाही, तर न्यूझीलंडने एक बदल केला. 256 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंड कधीही विजयाच्या शर्यतीत नव्हता.टिम सेफर्टच्या 52 आणि कर्णधार मिचेल सँटनरच्या 43 धावा वगळता, इतर कोणत्याही किवी फलंदाजाला प्रभावी खेळी करता आली नाही.
या सामन्यात डॅरिल मिशेलने 11 चेंडूत 17 धावा केल्या. भारताकडून जसप्रीत बुमराहने सर्वाधिक चार बळी घेतले. अक्षर पटेलने तीन फलंदाजांना बाद केले. हार्दिक पंड्या, वरुण चक्रवर्ती आणि अभिषेक शर्मा यांनीही प्रत्येकी एक बळी घेतला.
