मतदारांनी रचला नवा इतिहास; स्वतंत्र भारताच्या इतिहासात पश्चिम बंगाल-तामिळनाडूत पहिल्यांदाच विक्रमी मतदान
1 min read
नवीदिल्ली दि.२४:- भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत ७५ वर्षांत एकदाही झालं नाही असं विक्रमी मतदान यंदा पश्चिम बंगाल आणि तामिळनाडू या दोन राज्यांमध्ये झालं आहे. निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी याची माहिती दिली. याची सविस्तर आकडेवारीच निवडणूक आयोगानं जाहीर केली आहे.
इतक्या प्रमाणावर मतदान वाढण्यामागं आयोगानं केलेल्या विविध मोहिमांचा हा परिणाम असल्याचंही ज्ञानेश कुमार यांनी म्हटलं आहे. त्यामुळं या राज्यातील जनतेच्या मनात नेमकं काय आहे? याचा थांगपत्ता लागणं तज्ज्ञांना मुश्किल झालं आहे.ज्ञानेश कुमार म्हणाले कि, स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंतच सर्वाधिक मतदान पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूत झालं.
भारतीय निवडणूक आयोग पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूतील प्रत्येत मतदाराला सलाम करतो. तामिळनाडूमध्ये एकाच टप्प्यात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडलं. तर पश्चिम बंगालमध्ये दोन टप्प्यांमध्ये मतदान होणार आहे. यांपैकी पहिल्या टप्प्यातील मतदान आज पार पडलं.
तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यात आज सकाळी ७ वाजल्यापासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान पार पडलं. यामध्ये तामिळनाडूत संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ८४.६९ टक्के मतदान झालं ते ६ वाजेपर्यंत ९० टक्क्यांवर किंवा त्याहून अधिक होण्याची शक्यता आहे.
तर पश्चिम बंगालमध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ९१.७८ टक्के इतक विक्रमी मतदान झालं, ते आता ६ वाजेपर्यंत ९५ किंवा त्यापेक्षा जास्त टक्के होण्याची शक्यता आहे. अद्याप निवडणूक आयोगानं अंतिम मतदानाचा आकडा जाहीर केलेला नाही.
