हवामान खात्याने दिली आनंद वार्ता; राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
1 min readपुणे दि.२१:- गेल्या काही दिवसांपासून शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण जून महिना संपत आला तरी अद्याप महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली नाही. मान्सून लांबल्याने शेतकऱ्यांना पेरणीला उशीर होत आहे. यामुळे बळीराजा हतबल झाला आहे. मात्र अशातच भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी दिलासा दिला आहे.
येत्या 4 दिवसांमध्ये राज्यातील वातावरण बदलून काही जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 23 व 24 जूनला राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यासह मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हलक्या सरीं कोसळतील असा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे. तसेच या वर्षी राज्यात 96 टक्के पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
यंदाच्या वर्षी बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून महाराषटीरात उशिरा दाखल झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पुणे या जिल्ह्यांत पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. जून महिन्यात पावसाला उशीर झाला असला तरी पाऊस ऑक्टोबर महिन्यापर्यंत राहील.
तसेच एल निनोचा खूप परिणाम जाणवणार नाही. मात्र माईल्ड परिणाम असेल. अनेकदा एल निनो असून देखील चांगला पाऊस पडतो त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.