पश्चिम महाराष्ट्र, कोकणात अवकाळी पावसाचा अंदाज

1 min read

मुंबई दि.२६:- महाराष्ट्रातील शेतकऱ्यांपासून ते सर्वसामान्य लोकांवर दुहेरी संकट आहे. एकीकडे हैराण करणारी उष्णता आणि दुसरीकडे संध्याकाळी पाहुण्यासारखा अचानक येणारा पाऊस, त्यामुळे वातावरणात वेगानं बदल होत आहेत. पिकांचं अतोनात नुकसान आणि वातावरणातील बदलाचे शरीरावर होणारे परिणाम अशा दोन्ही गोष्टींचा सामना करावा लागत आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा अवकाळी पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.दक्षिणेकडून वरच्या दिशेनं सायक्लोनिक सर्क्युलेशनची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वेगानं वारे वाहात असून चक्रीवादळात रुपांतर होतं का पाहावं लागणार आहे. कमी दाबाचा पट्टा तयार होत असून त्यामुळे दक्षिणेकडील राज्यांमध्ये अति उष्णता आणि अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरं म्हणजे उत्तरेकडेही सायक्लोनिक सर्क्युलेशनसारखी स्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानकडून येणारे वारे उत्तरेतील वातावरणावर परिणाम करत आहेत. त्यामुळे दिवसा अचानक वाढणारं तापमान आणि संध्याकाळी किंवा रात्री येणारा अवकाळी पाऊस त्यामुळे हवेत निर्माण होणारा गारवा असे सतत हवामानात बदल होत आहेत.

पुढचे पाच दिवस कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील. रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात तुरळक पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सातारा, कोल्हापुरातही विजांच्या कडकडाटासह तुरळक पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातही तुरळक पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सोलापूर, धाराशिव आणि सांगली तीन जिल्ह्यांसाठी 29 मार्च रोजी अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह, वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे