राज्य सरकारचा मोठा निर्णय; राज्यातील सर्व शाळांमध्ये राष्ट्रगीतासह राज्यगीत होणे अनिवार्य अन्यथा शाळांवर तातडीने कारवाई
1 min read
मुंबई दि.१४:- राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा बंधनकारक करण्यात आल्याची घोषणा शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी केली. तसेच या नियमाचे पालन न करणाऱ्या शाळांवर तातडीने कारवाई करण्याचा देखील इशारा त्यांनी दिला.
यानंतर आता राज्यातील सर्व शाळांमध्ये यापुढे राष्ट्रगीत पाठोपाठ राज्यगीत होणं अनिवार्य करण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे आता ‘जय जय महाराष्ट्र माझा… गर्जा महाराष्ट्र माझा’ हे गीत रोज सकाळी शाळांमध्ये गुंजणार आहे.
पुढील वर्षापासून शालेय शिक्षणात सीबीएससी बोर्डातील काही निवडक चांगल्याबाबींचा शिक्षणात समावेश केला जाणार असल्याचे भुसे म्हणाले.
याबाबतचं नियोजन हे पूर्ण झालेले आहे. तत्पूर्वी शिक्षकांना त्याची ट्रेनिंग या चालू वर्षात दिली जाईल असे भुसे म्हणाले. पुढील वर्षापासून शालेय शिक्षणात सीबीएससी बोर्डातील निवडक अभ्यासक्रमाची अंमलबजावणी होईल, असे भुसे म्हणाले आहेत.
राज्यातील सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी वगैरे सर्व बोर्डाच्या शाळांमध्ये राष्ट्रगीतानंतर राज्यगीत दर दिवशी शाळा भरण्याआधी वाजवावे. यामुळे विद्यार्थ्यांना शालेय वयापासून महाराष्ट्राचा इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि भौगोलिक महत्त्व समजून घेता येईल, असे दादा भुसे यांनी सांगितले.
एकीकडे राज्यातील सीबीएसई, आयसीएसई बोर्डाच्या शाळांमध्ये मराठी भाषा शिकवण्याबाबत गांभीर्याने कार्यवाही होत नसताना आता शालेय शिक्षणमंत्र्यांनी राज्यगीत अनिवार्य केल्याने या निर्णयाची अंमलबजावणी होणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.