हरीण व रानडुकराच्या कळपाचा उभ्या पिकात धुडगूस

1 min read

आणे दि.१०:- आणे (ता. जुन्नर) येथे रानडुकरांच्या व हरणांच्या कळपाने शेतकऱ्याचे प्रचंड नुकसान चालू केले आहे. आणे, नळवणे, पेमदरा, शिंदेवाडी गावांत शेकडो शेतकऱ्याचे हजारो रुपयांचे नुकसान हे वन्य प्राणी करत आहेत. वनविभागाने याची दखल घेऊन यावर उपाय योजना करावी अशी मागणी केली आहे.आणे, नळवणे, पेमदरा, शिंदेवाडी या परिसरातील मळा रान व बहुतांश डोंगराळ भाग असल्याने या परिसरात नेहमीच वन्य प्राणी आढळत आहेत. हरणांचे कळप दिवसा नागरिकांना दिसतात. बिबट्याच्या भितीनंतर आता शेतकऱ्यांनी रानडुकराच्या व हरणांच्या कळपांचा वारंवार होणाऱ्या शेती पिकाचा नुकसानीचा धसकाच घेतला आहे. अनेक उपाय करून देखील रानडुकराचे कळप शेतात उभ्या असणाऱ्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत. आणे पठारावरील नवनाथ दाते, पांडुरंग दाते, शरद दाते, दादाभाऊ आग्रे, बाळू दाते, बबन दाते, माऊली संभेराव, विजू संभेराव, बाबाजी संभेराव या व अशा शेकडो शेतकऱ्यांच्या मका, ज्वारी, गहू, हरभरा, तुर, कांदे, विलायती गवत अशा पिकांचे रानडुकरांच्या कळपाने नुकसान केले आहे.

चौकट

…तर आम्हाला परवानगी द्या !

शेतकऱ्यांच्या शेतीमालावर वारंवार होणाऱ्या रानडुकराच्या हल्ल्यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शेतकऱ्यांना त्यामुळे आर्थिक फटका बसत आहे. वनविभागाने या रानडुकरांचा बंदोबस्त करावा अथवा आम्हाला त्यांचा बंदोबस्त करण्याची परवानगी द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

प्रतिक्रिया

“नुकसान झालेल्या
संबंधित शेतकऱ्यांनी वनविभागाला कळवावे. शेतकऱ्यांनी योग्य प्रकारे अर्ज करून द्यावा. वनविभाग, तलाठी, कृषी अधिकारी एकत्रित पंचनामा करतील. सबंधित शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळू शकते.”

लहू ठोकळ
वनपरिक्षेत्र अधिकारी ओतूर

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे