मंत्रिमंडळ विस्तारासाठी भाजप ॲक्शन मोडवर; दिल्लीत खलबतं
1 min read
मुंबई दि.१३:- राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रीमंडळाचा विस्तार कधी होणार? कोणत्या पक्षाला किती आणि कोणती मंत्रीपदं मिळणार याची चर्चा सुरु आहे.येत्या १४ डिसेंबरला म्हणजे शनिवारी मंत्रीमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जातेय. अशातच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले आहेत. भाजपच्या दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केल्यानंतर बावनकुळे एकनाथ शिंदेंची भेट घेत आहेत.
दरम्यान, 14 डिसेंबरला होण्याऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील ही भेट महत्वाची मानली जात आहे. भाजप ॲक्शन मोडवर आली आहे. मंत्रीमंडळ विस्ताराच्या संदर्भात या दोन्ही नेत्यांमध्ये महत्वाची चर्चा होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री उशिरा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा केली असल्याची माहिती आहे.तर भाजपला किमान 23 मंत्रिपदे हवी असून, सध्या तरी त्यांच्याकडून 25 मंत्रिपदांची मागणी केली जात आहे.
शिवसेनेला 13 आणि राष्ट्रवादी काँग्रेसला 9 ते 10 मंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे. फडणवीसा यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी देखील रात्री उशिरापर्यंत चर्चा केली आहे. यावेळी भाजपचे पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा उपस्थित होते.
हिवाळी अधिवेशनाच्या आधी खातेवाटप होणार असल्याची चर्चा असली, तरी प्रत्यक्षात शनिवारी शपथ घेणाऱ्या मंत्र्यांवर हिवाळी अधिवेशनानंतर विविध खात्यांची जबाबदारी सोपवण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. मंत्रीमंडळ विस्तारासाठी आता 14 डिसेंबरचा मुहूर्त असल्याच्या चर्चेने आमदारांची धाकधूक वाढली आहे.
त्याचबरोबर काही नेत्यांना डच्चू मिळण्याची शक्यता असल्याने आता सर्वांचं लक्ष मंत्रीमंडळ विस्ताराकडे लागलं आहे. आमदार अब्दुल सत्तार यांना मंत्रिमंडळात घेण्यासाठी भाजपकडून विरोध करण्यात आला आहे. शिवसेनेतील काही आमदारांनीही सत्तार यांच्या नावाला विरोध केल्याची माहिती आहे.
डॉ. तानाजी सावंत, माजी मंत्री संजय राठोड यांनाही सत्तेत सामील करून घेण्यास भाजपचा विरोध आहे. शिंदे मात्र सावंत यांच्या समावेशाबाबत आग्रही आहेत. सावंत यांनी आरोग्यमंत्री म्हणून उत्तम काम केले असल्याचे त्यांनी भाजपला सांगितले आहे.