महायुतीचा लोकसभा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला? भाजपला ३२, शिवसेना १२ तर अजित पवार गटाला ४ जागा
1 min readमुंबई :-दि. २० भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनानंतर महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या चर्चेला वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाच्या वाटाघाटींना सध्या वेग आला आहे. महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला अपेक्षेप्रमाणे सर्वाधिक जागा आल्या आहेत. तर शिंदे गट आणि अजित पवार गटाला तडजोड करावी लागली आहे.
महाविकास आघाडीत जवळपास ४० जागांवर एकमत झाल्याची माहिती आहे. फक्त ८ जागांवरुन तिढा कायम आहे. तर दुसरीकडे आता महायुतीमधील घटकपक्षांची जागावाटपाची चर्चाही अंतिम टप्प्यात आल्याची माहिती आहे.
भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांच्यात लोकसभेचे जागावाटप कसे होणार, याची उत्सुकता राजकीय वर्तुळाला लागून राहिली होती.
महायुतीच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर आता लोकसभा जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, महायुतीमध्ये लोकसभेला 32-12-4 या सूत्रानुसार जागावाटप होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपच्या वाटयाला सर्वाधिक ३२ जागा येतील. तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या वाट्याला १२ जागा येतील.
तर अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला अवघ्या 4 जागांवर समाधान मानावे लागू शकते. त्यामुळे अजित पवार नाराज होण्याची शक्यता आहे. परंतु, लोकसभेला भाजपला अधिक जागा मिळाल्या तरी विधानसभेला शिंदे गट आणि अजित पवार गटाला चांगला वाटा मिळू शकतो.
परंतु, त्यासाठी शिंदे गट आणि अजितदादा गट राजी होणार का, हे पाहावे लागेल. सध्या महायुतीच्या राज्यातील नेत्यांमध्ये जागावाटपाची चर्चा सुरु आहे. परंतु, अंतिम निर्णय हा दिल्लीतून होईल, असे सांगितले जात आहे. यामध्ये अमित शाह महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.