यंदा राज्यातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस:-पंजाब डख

1 min read

पुणे दि.२:- अनेक वर्षांचे प्रचलित आडाखे मोडून काढत यंदा मे महिन्यातच देशात आणि राज्यात दाखल झालेला मान्सूनचा पाऊस शेतकऱ्यांसाठी खास ठरण्याची शक्यता आहे. यंदा मे महिन्यातच भरपूर पाऊस झाला आहे. सध्या पावसाने दडी मारली असली तरी जून महिन्यात तो पुनरागमन करेल. त्यामुळे यंदा कधी नव्हे ती शेतकऱ्यांना जून महिन्यात पेरणी करता येईल. याचा मोठा फायदा शेतकऱ्यांना होईल. यामुळे यंदा शेतीत पीक चांगले येईल, असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी वर्तवला आहे. दरवर्षी 20-22 मे दरम्यान मान्सून अंदमानात दाखल होतो. यंदा मात्र, 12 मे रोजी मान्सून अंदमानात दाखल झाला. त्यानंतर तो शॉर्टकट मार्गाने तो पुढे सरकला, त्यात पोषक वातावरण म्हणून अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. तीन वर्षांपूर्वी असेच झाले होते. तेव्हा मान्सून आल्यावर चक्रीवादळ आले होते, पण ते ओमान आणि दुबईकडे गेले होते. यंदा हे चक्रीवादळ महाराष्ट्रात सरकले त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला, असे पंजाबराव डख यांनी म्हटले. राज्यात आतादेखील काही ठिकाणी हलक्या सरी कोसळत राहतील. 2-3 जूनला नाशिक, सोलापूरमध्ये हलक्या सरी कोसळतील. 1-6 जूनपर्यंत सूर्यदर्शन होईल.त्यामुळे शेतकऱ्यांनी या काळात शेतीचे कामे पूर्ण करून घ्यावीत. 7-8 दरम्यान पुन्हा पाऊस असेल, त्यानंतर पुन्हा 4 दिवस पाऊस विश्रांती घेईल. स्थानिक परिस्थिती पाहून शेतकऱ्यांनी पेरणी करून घ्यावी. जमिनीत ओलावा भरपूर झाला आहे, पेरणीची तयारी करून ठेवा आणि जसा वापसा होईल तशी पेरणी करून घ्या, असा सल्ला पंजाबराव डख यांनी शेतकऱ्यांना दिला. पंजाबराव डख यांनी यंदा राज्यातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येतील, असा अंदाज वर्तवला आहे. पेरणीच्यादृष्टीने यंदाचा हंगाम खूप चांगला आहे. 1 जूनला महाराष्ट्रमध्ये कधीच पाऊस नसतो, पण यंदा त्याआधीच पाऊस झाला आहे. ज्यावर्षी जून महिन्यात पेरणी होते त्यावेळी पिकांना खूप चांगला उतारा येतो. स्थानिक परिस्थिती पाहून शेतकऱ्यांनी स्वतः पेरणीचा निर्णय घ्यावा, असे डॉ. पंजाबराव डख यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे