मातोश्री ग्लोबल स्कूल व ज्युनियर कॉलेज कर्जुले हर्या येथे वृक्षारोपण व हरित दिन उत्साहात साजरा
1 min readकर्जुले हर्या दि.५:- मातोश्री ग्लोबल स्कूल व ज्युनियर कॉलेज कर्जुले हर्या (ता. पारनेर) येथे वृक्षारोपण व हरित दिन उत्साहात साजरा झाला.सर्वप्रथम हरित दिनाच्या सुरुवातीस हरित वस्त्र परिधान केलेले सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यां सह वृक्षदिंडी काढण्यात आली. त्यानंतर शालेय परिसरात ठीक ठिकाणी विद्यार्थी, विद्यार्थिनी व शिक्षक बंधू-भगिनींनी मोठ्या उत्साहाने वेगवेगळ्या प्रकारचे वृक्षा रोपण केले.तदनंतर मातोश्री ग्लोबल स्कूल व ज्युनिअर कॉलेज कर्जुले हरिया च्या प्राचार्या शितल किरण आहेर यांनी वृक्षारोपण व हरित दिनाच्या कार्यक्रमात आपल्या भाषणात सांगितले की,मानवाने तंत्रज्ञान व संगणकीय युगात सर्वच क्षेत्रात अविश्वसनीय प्रगती व संशोधन केले असले तरी मनुष्य निसर्गापुढे पूर्णतया हतबल झाला आहे. आज आपण आपल्या सभोवती झालेली अतिवृष्टी, महापूर व धडाधड कोसळणारे डोंगर, क्षणात कोसळणार्या आलिशान इमारती, महापुरात उलटी सुलटी खेळणी सारखी वाहणारी वाहने दरवर्षाला बघत आहोत. हे सर्व बघुन कुठल्याहि संवेदनशील माणसाचे मन व्यथित झाल्या शिवाय रहात नाही. ही सर्व परिस्थिती पर्यावरणातील असंतुलन, मोठ्या प्रमाणावर झालेली जंगलतोड, वृक्षतोड, जमिनीचे झालेले खनन व वाढत्या वाहनांमुळे झालेले प्रदूषण या गोष्टी आहेत.परिणामतः पृथ्वीवरील ओझोनच्या आवरणावर देखील ठीक ठिकाणी ठिगळ पडून विपरीत परिणाम झालेला आहे. परिणामत: अमेरिकेत सूर्यकिरणे तेथील लोकांच्या त्वचेवर परिणाम करून तेथील लोकांना त्वचा विकार झालेले आहेत.विद्यार्थ्यांना संबोधन करतांना आहेर पुढे म्हणाल्या कि आज काळाची गरज म्हणून केवळ वृक्ष लावून चालणार नाही तर वृक्षाचे संवर्धन करणे, बोडके झालेल्या डोंगरांवर पुन्हा वृक्ष लागवड करून जंगला चे संवर्धन देखील अत्यावश्यक झालेले आहे. अन्यथा पृथ्वीवरील मानव जातीस निसर्गाच्या विनाशकारी चक्रास व वाढत असलेल्या ग्लोबल वार्मिंग च्या धोक्याशी झुंजने अशक्यप्राय होऊन जाईल. अशी जगभर परिस्थिती तयार झाली आहे.याकरिता आज गरज आहे ती पर्यावरण संवर्धन, वृक्ष लागवड व संवर्धन, वनसंवर्धन, वन्यजीव संरक्षण व वाढत असलेले प्रदूषण नियंत्रण व त्याकरिता आवश्यक आहे लोक जागृती व प्रबोधनाची जे आपण सर्व शिक्षक, विद्यार्थी, पालक, शासन व सर्व स्तरावरील व्यक्तींनी करावयाचे आहे तरच आपण आपली वसुंधरा वन्य प्राणी व मानव जातीसाठी सुरक्षित ठेवू शकतो असेही प्राचार्या सौ. शितल आहेर यांनी आपल्या भाषणाच्या शेवटी सांगितले.तदनंतर सत्यम कोल्हे, अंश निषाद,आदित्य गुंड, हर्षवर्धन मंचरे, गणेश वाढवणे, आराध्य खोबरे, तेजस भांड, सार्थक उंडे, अनिकेत शिंदे, कल्पिता छाजेड, सृष्टी उंडे, श्रुतिका दातिर, प्रगती मोंढवे व दीक्षा डुकरे या विद्यार्थ्यांनी वृक्ष लागवड व संवर्धनाच्या महत्त्वावर आधारित नाटिका सादर केली. सदर नाटिकेचे संयोजन शाळेतील शिक्षिका संध्या निवडूंगे व राणी रासकर यांनी केले. तसेच विराज आहेर, अलशिफा शेख, वंशिका झावरे, वैष्णवी शिंदे, ओवी बर्वे व मनस्वी कटारिया या विद्यार्थ्यांनी भाषणाद्वारे पर्यावरण व प्रदूषणावर आपले मत व्यक्त केले. शाळेत पर्यावरण व वृक्ष संवर्धनावर वर्गवार स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या सदर स्पर्धेत इ. ३री च्या वर्गाने प्रथम क्रमांक मिळविला सदर वर्गाच्या वर्ग शिक्षिका अश्विनी केदार यांनी विद्यार्थ्यांसह विशेष परिश्रम घेतले होते. स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या इ.३ री च्या सर्व विद्यार्थ्यांचे तसेच त्यांच्या वर्गशिक्षिका अश्विनी केदार यांचे संस्थेचे विश्वस्त डॉ. दिपक आहेर यांनी अभिनंदन केले.या कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्षा मिराताई आहेर, विश्वस्त डॉ. दिपक आहेर,विश्वस्त डॉ. श्वेतांबरी आहेर, संस्थेचे सेक्रेटरी डॉ.किरण आहेर, कार्यालयीन अधीक्षक यशवंत फापाळे, शाळेचे प्रशासकीय अधिकारी प्रकाश व्यास, शाळेतील शिक्षक विशाल डोळस, सुनील उंडे, सुनील रोकडे, जाफर शेख, प्रगती आहेर, सायली पिंगट, शुभांगी निमसे, स्नेहा झावरे, अनिता औटी, सविता भांड, प्रतिमा पवार, किर्ती शिंदे तसेच पालक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फरीद पटेल व आभार विशाल डोळस यांनी केले.