महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालविण्याचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ अवगत असणे आवश्यक
1 min read
मुंबई दि.२८:- महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालविण्याचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ अवगत असणे आवश्यक आहे, यावर राज्य शासन ठाम आहे. ज्यांना मराठी येत नाही अशा अमराठी चालकांना ती शिकविण्यासाठी रिक्षा संघटनांनी सकारात्मक सहकार्य करावे, असे आवाहन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत केले.
प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक असलेली प्राथमिक मराठी भाषा चालकांना शिकवण्यासाठी शासन विविध उपाययोजना राबवित आहे. या उपक्रमात मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषद यांसारख्या संस्थांचे तसेच साहित्यिकांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
याशिवाय रिक्षा व टॅक्सी संघटनांनीही मराठी शिकवण्या साठी सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे, ही अभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.अमराठी चालकांना मराठी शिकण्यासाठी ठराविक मुदत द्यावी, ही संघटनांची मागणी योग्य असून त्यावर सकारात्मक विचार सुरू आहे.
तथापि, मराठी भाषा शिकणारच नाही अशी मजुरी दाखवणाऱ्यांच्या बाबतीत मात्र कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा मंत्री सरनाईक यांनी दिला. तसेच मंगळवारी परिवहन आयुक्तालयात राज्यातील ५९ प्रादेशिक व उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांच्या बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा करून योग्य निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
