कार्यकर्त्यांचा हंबरडा, दादांना अखेरचा निरोप देण्यासाठी बारामतीत लोटला लाखोंचा जनसमुदाय
1 min read
बारामती दि.२९:- महाराष्ट्राच्या राजकारणातील ‘लाडके दादा’ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे.बुधवारी बारामतीमध्येच अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. ज्यामध्ये त्यांचा दुर्दैवी अंत झाला. अजित पवारांच्या निधनाची बातमी समजताच अवघा महाराष्ट्र सुन्न झाला.
गावागावात बंद पाळण्यात आले असून आज त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखोंचा जनसमुदाय बारामतीमध्ये दाखल झाला आहे. महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री म्हणून गावागावात पायाला भिंगरी लावून फिरणारं, अवघ्या महाराष्ट्रात लोकप्रिय झालेलं अन् प्रत्येकाला आपलं वाटणारे
नेतृत्व म्हणजे अजित पवार. बारामतीच्या मातीतून उदयास आलेले हे वादळ आज बारामतीमध्येच शांत होणार आहे. बारामतीमधील विद्याप्रतिष्ठानच्या प्रांगणात अजित पवार यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शोक व्यक्त केला जात आहे.
सोशल मीडियावर, प्रत्येकाच्या स्टेटसला अजित दादांच्या श्रद्धांजलीची लाट अन् डोळ्यात अश्रुंचा महापूर पाहायला मिळत आहे.अजित पवार यांच्या निधनाची बातमी येताच गावागावातून लोक बारामतीमध्ये दाखल होत आहेत. महाराष्ट्राच्या लाडक्या नेत्याला निरोप देण्यासाठी लाखोंचा जनसमुदाय लोटला आहे.
अजित पवार यांना निरोप देण्यासाठी आलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. प्रत्येकजण घरातला माणूस गेल्याची भावना व्यक्त करत आहे. माझा देवा गेला, आमचा दादा गेला,नेता गेला म्हणत कार्यकर्त्यांनी केलेला आक्रोश अक्षरश: काळीज पिळवटून टाकत आहे.
तळागाळातील जनतेसाठी सदैव झटनारा नेता गेला, आम्हाला कोणी वाली उरला नाही म्हणत प्रत्येकजण हळहळ करत आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी महाराष्ट्रभरातील विविध पोलिसांच्या तुकड्या या परिसरात तैनात करण्यात आल्या आहेत.
