राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार
1 min read
मुंबई दि.२२:- राज्यातील तापमानात सध्या चढ – उतार सुरू आहे. अनेक भागात सरासरीपेक्षा कमी किमान तापमानाची नोंद होत आहे. दरम्यान, हवामान विभागाच्या विस्तारीत अंदाजानुसार महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात ४ डिसेंबरपर्यंत तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज आहे.
धुळे येथे शुक्रवारी राज्यातील सर्वात कमी ७.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.मागील काही दिवस राज्याच्या तापमानात घट झाली आहे. अनेक भागात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली आहे.त्या तुलनेत शुक्रवारी तापमानात काहीशी वाढ दिसून आली.
मुंबईच्या तापमानातही सातत्याने चढ – उतार होत आहे. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात २२.४ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात १७.४ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. उत्तर भारतातही तापमानात किंचीत वाढ झाली आहे.
दरम्यान, महाराष्ट्रासह मध्य भारतातील काही भागात ४ डिसेंबरपर्यंत तापमान सरासरीपेक्षा कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे राज्यात थंडीचा कडाका कायम राहणार आहे. पहाटे आणि रात्री गारवा, तसेच दिवसभर बोचरे वारे यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे.
मराठवाडा आणि विदर्भातील तापमानातील घट कायम आहे. या भागात तापमानात चढ – उतार सुरू असले तरी थंडीचा कडाका कायम आहे. गेले काही दिवस राज्यातील तापमान किमान तापमान ८ ते १२ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदले जात आहे.
लक्षद्वीप बेट आणि मालदीव परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, त्याला लागूनच चक्राकार वारे वाहत आहेत. या प्रणालीमुळे दक्षिण भारतात पावसाचा जोर वाढणार आहे. तसेच राज्यातील थंडीची लाट ओसरली तरी गारठा कायम राहण्याची शक्यता आहे.
