मान्सूनचा प्रवास थंडावला; बिपरजॉय चक्रीवादळाचाही मान्सूनवर परिणाम
1 min read
पुणे दि.१४:- मान्सूनने मंगळवारी (दि. १३) राज्यात प्रगती केली नाही. बिपरजॉय चक्रीवादळाचाही मान्सूनवर परिणाम होत आहे. तर या चक्रीवादळामुळे गुजरात आणि राजस्थानमधील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडला आहे. तर १५ जूनला सायंकाळी हे वादळ गुजरातमधील जखाऊ बंदराजवळ धडकण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.
सौराष्ट्र आणि कच्छ किनाऱ्यावर ऑरेंज
अलर्ट दिला आहे. तसेच मंगळवारी कोकण, मध्य महाराष्ट्रात पाऊस पडला आहे.
मान्सून ८ जून रोजी केरळमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर मान्सूनने प्रवास सुरू केला. साधारणतः ७ जूनपर्यंत कोकणात येणारा मान्सून यंदा ११ जून रोजी दाखल झाला.
मान्सूनने सोमवारी कोकण, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगालचा काही भाग व्यापला होता. पण, मंगळवारी मान्सूनने प्रगती केली नाही. मान्सूनची सीमा रत्नागिरी,
कोप्पाल, पुट्टापारथी, श्रीहरीकोटा, मालदा आणि फोरबेसगंज या भागातच होती.
दरम्यान, बिपर जॉय चक्रीवादळाची तीव्रता वाढली आहे. चक्रिवादळ देवभूमी द्वारकेपासून ईशान्येला २८० किलोमीटर, पोरबरच्या वायव्यला ३०० किलोमीटर, जखाऊ बंदराच्या वायव्येला ३१० किलोमीटर आणि पाकिस्तानमधील कराचीच्या ४५० किलोमीटर अंतरावर होती. बिपरजॉय चक्रिवादळ उत्तरेकडे सरकण्याची शक्यता आहे.