राज्याचे लक्ष मुंबईकडे निघालेल्या मराठा बांधवांच्या हजारो वाहनांच्या ताफ्याकडे
1 min read
मंचर दि.२९:- मराठा समाजाच्या आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून संघर्ष करणारे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आरपारची लढाई उभारली आहे.या आरक्षण यात्रेने (दि. २८) किल्ले शिवनेरीचा ऐतिहासिक साक्षीदार ठरत माथ्यावर मातीतिलक करून मुंबईच्या दिशेने कूच केले.
या यात्रेत सामील होण्यासाठी राज्यभरातून कार्यकर्त्यांचा जनसागर उसळला असून, हजारो वाहनांच्या ताफ्यामुळे पुणे-नाशिक महामार्ग, चाकण-तळेगाव मार्ग आणि जुन्नरमार्ग भगवामय झाले आहेत.हजारो वाहनांच्या ताफ्यामुळे वाहतुकीवर परिणाम झाला.
सकाळपासूनच पुणे-नाशिक महामार्गावर वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. या यात्रेचे राजकीय, सामाजिक आणि प्रशासकीय परिणाम पुढील काही दिवसांत प्रकर्षाने दिसतील. एका बाजूला मराठा समाजात उत्साह आणि लढाऊ जिद्द आहे, तर दुसरीकडे वाहतूक,
कायदा-सुव्यवस्था आणि औद्योगिक हालचालींचा मोठा प्रश्न प्रशासनासमोर उभा ठाकला आहे. मुंबईतील आझाद मैदानावर होणारे उपोषण आणि त्याला मिळणारा प्रतिसाद यावरच पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. चाकण व परिसरातील शाळांना प्रशासनाने सुट्टी जाहीर केली आहे.
यात्रेत सहभागी कार्यकर्त्यांसाठी खेड तालुक्यातील मराठा समाज व ग्रामस्थांनी ठिकठिकाणी चहा, नाष्टा, पाणी आणि जेवणाची सोय केली आहे. रस्त्यांवर स्वागत कमानी, भगवे झेंडे,घोषवाक्ये आणि फलक लावून यात्रेचे स्वागत करण्यात आले. वातावरणात जय जिजाऊ, जय शिवराय
आणि मराठा आरक्षण हक्क आमचा अशा घोषणांचा निनाद घुमला. या निमित्ताने समाजातील विविध संघटना, स्वयंसेवी संस्था आणि गावोगावी युवक मोठ्या संख्येने पुढे आले. मनोज जरांगे पाटील यांनी शिवनेरीच्या पवित्र मातीतिलक करून आमचा संघर्ष हा आता शेवटपर्यंतचा असल्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
मुंबईतील आझाद मैदानावर ते उपोषणास बसणार असून, राज्य सरकारला ठोस निर्णय घेण्यासाठी हा दबाव आंदोलनाचा टप्पा मानला जात आहे.मराठा समाजाच्या आत्मसन्मानाची ही लढाई आता निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या यात्रेकडे लागले आहे.
