राज्यातील २६ लाख संशयित लाडक्या बहिणींवर होणार कारवाई
1 min read
मुंबई दि.११:- ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत मोठा गैरव्यवहार उघड झाला आहे.या प्रकरणी २६ लाखांहून अधिक संशयित लाभार्थ्यांची चौकशी करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ अपात्र व्यक्ती, पुरुष आणि सरकारी कर्मचारी घेत असल्याचे आढळून आले आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संशयित लाभार्थ्यांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या तपासणीमुळे योजनेत पारदर्शकता आणण्याचा आणि खऱ्या गरजू महिलांपर्यंत लाभ पोहोचवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. महिला व बालविकास विभागाने केलेल्या प्राथमिक पाहणीत काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत.
या योजनेनुसार २१ ते ६५ वयोगटातील महिलांनाच लाभ मिळायला हवा. मात्र या वयोगटाबाहेरील महिलांनाही पैसे मिळत असल्याचे दिसून येत आहे. तसेच नियमानुसार एका कुटुंबातील फक्त दोन महिलांनाच लाभ घेता येतो. पण अनेक ठिकाणी तीन किंवा त्याहून अधिक महिला या योजनेचा लाभ घेत असल्याचे समोर आले आहे.
तसेच काही लाभार्थी बनावट कागदपत्रे वापरून या योजनेचा लाभ घेतल्याचा संशय आहे. त्यामुळे राज्य सरकारने २६ लाखांहून अधिक संशयित लाभार्थ्यांची कसून चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.याआधीच्या एका तपासणीत तब्बल १४,००० पुरुषांनी १० महिन्यांपर्यंत या योजनेचा लाभघेतल्याची माहिती समोर आली होती.
तसेच, २,००० पेक्षा जास्त सरकारी कर्मचाऱ्यांनीही चुकीच्या पद्धतीने पैसे घेतल्याचे उघड झाले होते. जिल्हा प्रशासनाला सर्व संशयित लाभार्थ्यांच्या अर्जाची आणि कागदपत्रांची फिजिकल व्हेरिफिकेशन (प्रत्यक्ष पडताळणी) करण्याचे आदेश दिले आहेत.
तसेच अंगणवाडी सेविका आणि स्थानिक प्रशासनाचे कर्मचारी घरोघरी जाऊन तपासणी करत आहेत. यात लाभार्थ्यांचे वय, कुटुंबातील सदस्यांची संख्या आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
ही चौकशी पूर्ण झाल्यावर, जे लाभार्थी पात्र आढळतील त्यांना योजनेचा लाभ मिळत राहील, पण जे अपात्र ठरतील, त्यांची नावे तत्काळ यादीतून काढून टाकली जातील.
