श्रावणी सोमवारी ऑपरेशन महादेव फत्ते; श्रीनगरमध्ये तीन दहशतवाद्यांना कंठस्नान

1 min read

श्रीनगर दि.२८:-जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश आले आहे. श्रावणी सोमवारी राबवलेल्या या मोहिमेला ‘ऑपरेशन महादेव’ असे नाव देण्यात आले आहे. कंठस्नान घातलेले तिघे अतिरेकी पहलगाम हल्ल्यातील संशयित असल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र यास अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील दाचीगाम राष्ट्रीय उद्यानाजवळील हरवान भागात चकमक झाली. आज, सोमवारी झालेल्या या चकमकीत तीन दहशतवाद्यांना ठार मारण्यात आले. गुप्त माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हे ऑपरेशन सुरू केले. भारतीय सैन्याच्या चिनार कॉर्प्सने ‘एक्स’ (ट्विटर) सोशल मीडिया अकाऊण्टवर यासंदर्भात माहिती दिली. “तीव्र गोळीबारानंतर तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. ऑपरेशन अजूनही सुरु आहे,” असे त्यांनी सांगितले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हरवानमधील मुलनार भागात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरुद्ध कारवाई सुरु केली. त्यावेळी दोन वेळा गोळीबाराचा आवाज ऐकू आला.त्यानंतर अधिक कुमक पाठवण्यात आली.दहशतवाद्यांना मारण्यासाठी शोध मोहीम अधिक तीव्र करण्यात आली. सेनेने महादेव टेकडीवर एक छावणी उभारली आहे, ज्याद्वारे या भागातील हालचालींवर लक्ष ठेवले जाते. दहशतवादी मुसाच्या हालचाली येथे बऱ्याच काळापूर्वी दिसल्या होत्या.म्हणूनच शोध मोहीम सुरू होती. सैन्यासोबत जम्मू-काश्मीर पोलिसही या कारवाईत सहभागी होते. सैन्याने ठार केलेल्या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सैन्य आणि दहशतवाद्यांमध्ये ज्या ठिकाणी चकमक झाली ती जागा टेकडीवर आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Don`t copy text!