आशांकुर फौंडेशन’ तर्फे श्री बेल्हेश्वर विद्यामंदिरातील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वाटप

1 min read

बेल्हे दि.१६:- “शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये इयत्ता पाचवीतील १६७ नवीन प्रवेशीत विद्यार्थ्यांना ‘आशांकुर फौंडेशन’ मार्फत दप्तर वाटप करण्यात आले. फौंडशनच्या उपक्रमाचे हे सलग दुसरे वर्ष असून या उपक्रमामुळे नवीन प्रवेशीत मुलांच्या चेहऱ्यावर शाळेच्या पहिल्याच दिवशी हास्य उजळले”, अशी माहिती विद्यालयाचे प्राचार्य राजेंद्र पडवळ यांनी दिली.महानगर को ऑप. बँक लिमिटेडचे सेवानिवृत्त अधिकारी कृष्णा बांगर व अभियंते वैभव बांगर यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘आशांकुर’ फौंडेशनच्या माध्यमातून शालेय दप्तर वाटप कार्यक्रम श्री बेल्हेश्वर विद्यामंदिर व कै. हरिभाऊशेठ गुंजाळ उच्च माध्यमिक विद्यालयात पार पडला. शाळा समितीचे ज्येष्ठ सदस्य विश्वनाथ डावखर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. माजी रयत सेवक बबन पिंगट यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. माजी विद्यार्थ्यांना शाळेशी जोडले पाहिजे, असे प्रतिपादन त्यांनी आपल्या प्रास्ताविकातून केले.

आशांकुर फौंडेशनचे संचालक कृष्णा बांगर यांनी आपल्या मनोगतात ‘आशांकुर’ फौंडेशनच्या स्थापनेमागील उद्देश व भूमिका स्पष्ट केली. संचालक अभियंते वैभव बांगर यांनी गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारे शिष्यवृत्ती योजना सुरु करण्याच्या फौंडेशनच्या भविष्यकालीन योजनेवर प्रकाश टाकला. कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वनाथ डावखर आपल्या अध्यक्षीय मनोगतातून, “आशांकुर फौंडेशनचे काम दीपस्तंभासारखे असून सर्व समाजाने त्यांच्या दातृत्वाचा आदर्श घ्यावा”, असे आवाहन केले.या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्या दीपाली मटाले, युवा उद्योजक सुमीत बोरचटे, सामाजिक कार्यकर्ते प्रदीप पिंगट, शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष सावकार पिंगट, शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र गाडगे, माजी रयत सेवक बबन पिंगट,विद्यालयाचे उपमुख्याध्यापक प्रवीण राशीनकर, पर्यवेक्षक दत्तात्रय खोरे, ‘आशांकुर’ फौंडेशनचे सदस्य जनाबाई बांगर, सुलोचना बांगर, बाळासाहेब बांगर, प्रतिक बांगर, पल्लवी बांगर, सुमित देवकर, शुभांगी देवकर, आदि मान्यवर उपस्थित होते. विकास गोसावी यांनी सूत्रसंचालन केले तर जयराम मटाले यांनी उपस्थितांचे आभार मानले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे