आषाढीसाठी ५२०० विशेष बस सोडणार:- परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

1 min read

पंढरपूर दि.१४:- आषाढी यात्रेनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरक्षित व सुखकर व्हावा यासाठी राज्य परिवहन महामंडळाकडून यात्रा काळात ५२०० विशेष बस सोडण्याचे नियोजन केले असल्याची माहिती परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. आषाढी यात्रा नियोजनासाठी चंद्रभागा बस स्थानक, पंढरपूर येथे एस टी महामंडळाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व एसटीचे सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.विविध पालख्यांबरोबर चालत दिंडीने येणाऱ्या प्रवाशांना एसटीने यंदा थेट गाव ते पंढरपूर अशी बससेवा उपलब्ध करून दिली आहे. या प्रवासातदेखील ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत प्रवास देणारी अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिलांसाठी तिकीटदरात ५० टक्के सूट देणारी महिला सन्मान योजना यांसारख्या सर्व सवलती लागू असतील, असे सरनाईक यांनी बोलताना स्पष्ट केले.लांब पल्ल्यावरून अनेक बसेस येत असतात. त्या बसचालकांची व वाहकांची राहण्याची चांगली व्यवस्था करावी. त्याचबरोबर त्यांना आंघोळीसाठी गरम पाणी उपलब्ध करून द्यावे. बसस्थानकातून बस प्रवाशांना घेऊन जाण्याअगोदर बसची देखभाल-दुरुस्ती करावी. बसच्या तत्काळ दुरुस्तीसाठी जादा तांत्रिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, अशा सूचनाही सरनाईक यांनी दिल्या. यात्रा काळात पंढरपूर येथे येणाऱ्या एसटीच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चहा-नाश्ता व जेवणाची मोफत सोय करण्यात येणार असल्याचेही त्यांनी बोलताना सांगितले.यात्राकाळात होणारी गर्दी लक्षात घेता एकाच बसस्थानकावर गर्दी होऊ नये यासाठी प्रवाशांच्या सोयीसाठी यात्रा कालावधीत पंढरपूर येथे चंद्रभागा, भीमा, पांडुरंग (आयटीआय कॉलेज) व विठ्ठल कारखाना अशी चार तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येणार आहेत. दरम्यान, यात्राकाळात बसस्थानकावर पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आदी सोयी-सुविधा पुरविण्यात येणार आहेत, असे ते म्हणाले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे