कर्जबाजारीपणामुळे तरुण शेतकऱ्याची गळफास घेत आत्महत्या; धक्क्याने वडिलांचा मृत्यू; दुहेरी दुःखाने आईला हृदयविकाराचा झटका
1 min read
नांदेड दि.१४:- सततची नापिकी, कर्जबाजारीपणा आणि आर्थिक अडचणींना कंटाळलेल्या एका २७ वर्षीय तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. मुलाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने तरुणाच्या वडिलांचा दोन दिवसांनी मृत्यू झाला. त्यानंतर तरुणाच्या आईला देखील हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. ही हृदयद्रावक घटना नांदेडच्या लोहा तालुक्यातील सावरगाव नसरत येथे घडली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, राहुल भीमराव बेदरे असे आत्महत्या करणाऱ्या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. कुटुंबाची हालाखीची परिस्थिती, अंथरुणाला खिळलेले वडील,
स्टेट बँकेचे कर्ज, साडेतीन एकर कोरडवाहू शेती या साऱ्या गोष्टींचा भार राहुलच्या खांद्यावर होता. शेती आणि मिळेल त्या ठिकाणी मजुरी करत तो आईवडिलांचा सांभाळ करत होता.पण वाढत्या कर्जबाजारीपणामुळे आणि शेतीत येणाऱ्या अपयशामुळे नैराश्यात जाऊन राहुलने १० जून रोजी झाडाला गळफास घेत आयुष्य संपवले.
मुलाच्या मृत्यूने भीमराव बेदरे यांच्या मनाला असह्य वेदना झाल्या. दोन दिवसात, १२ जून रोजी त्यांनी प्राण सोडले. पती आणि मुलगा या दोघांचाही मृत्यू पाहून राहुलची आई शोभाबाई यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर शोभाबाईंना रुग्णालयात दाखल करण्यात आहे.
सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे म्हटले जात आहे. सावरगाव परिसरात बहुतांश शेती ही कोरडवाहू प्रकारची आहे. तेथे सिंचनाची कोणतीही सोय उपलब्ध नाही. त्यामुळे या ठिकाणी शेतकरी कायमच दुष्काळी परिस्थितीशी लढत असल्याचे पाहायला मिळते.
या पार्श्वभूमीवर बेदरे कुटुंबावर कोसळलेले संकट हे विदारक वास्तव अधोरेखित करते. सरकारने या परिसरात सिंचनाची सोय करुन पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सोडवण्याचे आवाहन ग्रामस्थांनी केले आहे.