प्रभाग रचना करण्याचा राज्य सरकारचा आदेश
1 min read
मुंबई दि.११:- स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठीच्या हालचालींना वेग आला असून त्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रक्रिया सुरू करण्यात येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महापालिका, नगरपालिका आणि नगरपंचायतींना प्रभाग रचना करण्याचे आदेश राज्य सरकारनं दिले आहेत. अ, ब आणि क वर्ग महानगरपालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश सरकारने दिले आहेत. यामध्ये पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, पिंपरी चिंचवड, नवी मुंबई, वसई विरार, छत्रपती संभाजीनगर आणि कल्याण डोंबिवलीसारख्या महापालिकांचा समावेश आहे.
राज्यात गेल्या तीन ते चार वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडलेल्या आहेत. त्या निवडणुका घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर आता त्यासंबंधी हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत. या निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्यासंदर्भात राज्य सरकारने आदेश दिले आहेत.
राज्यात ज्या ठिकाणी महापालिका निवडणुका घेण्यात येणार आहेत त्या ठिकाणी आता प्रभाग रचनेचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामध्ये प्रभागांची रचना कशी करायची आणि लोकसंख्येचे काय निकष लावायचे याचे स्पष्ट निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील महापालिकांची प्रभाग रचना करण्याबाबतचे आदेश जारी करण्यात आल्यानंतर मुंबईमध्ये जुन्याच प्रभागानुसार निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यानुसार मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 एकसदस्यीय प्रभाग रचना करण्यात येणार आहे.
तर पुणे, नागपूर, ठाणे, नाशिक, नवीमुंबई, पिंपरी चिंचवड, छ. संभाजीनगर, यासह इतर सर्व महापालिकांमध्ये चार सदस्यांचे प्रभाग असणार आहेत. मुंबईमध्ये आधी 227 प्रभाग होते. महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर त्यामध्ये वाढ होऊन 236 प्रभाग करण्यात आले.
पुन्हा महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर 227 प्रभाग करण्यात आले. त्याला आव्हान सर्वोच्च न्यायालयात देण्यात आलं होतं. पण ती याचिका फेटाळण्यात आली. त्यामुळे मुंबईमध्ये 227 प्रभाग असणार आहेत.