मुंब्रा लोकल दुर्घटनेनंतर रेल्वे मंत्र्यांचा मोठा निर्णय
1 min read
मुंबई दि.१०:- मध्य रेल्वेवरील मुंब्रा येथे धोकादायक वळणावर दोन लोकल पास होताना तोल जाऊन १३ प्रवासी रुळांवर फेकले गेल्याने त्यातील सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू झाल्यानंतर आता रेल्वेमंत्र्यांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई उपनगरीय लोकलच्या डब्यांचे संपूर्ण डिझाईनच बदलण्याचा निर्णय रेल्वे मंत्र्यांनी घेतला आहे. कसारा आणि कल्याण लोकल पास होताना दारात लटकणारे प्रवासी रुळांवर पडल्याने आता सरकारला जाग आली आहे.ठाण्यापलीकडचा प्रवास दिवसेंदिवस धोकादायक होत आहे. त्यामुळे डोंबिवली, दिवा, मुंब्रा आणि कळवा येथे लोकलमध्ये शिरताना प्रवाशांची दमछाक होत असते.
या प्रवासात अनेक प्रवाशांचा हकनाक बळी जात आहे. काल घडलेल्या घटनेत प्रवासी दारात उभे असल्याने कोसळ्याचा रेल्वेचा दावा आहे. परंतू दारात लटकण्याची वेळ प्रवाशांवर नेमकी का येते याचा विचार कोणी करत नाही.
आता त्यामुळे रेल्वे मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे.त्यानुसार लोकलच्या डब्याचे संपूर्ण डिझाईन बदलण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईतील ईएमयू सर्बर्बन लोकलमध्ये बदल करण्यात येणार आहेत. आजच्या मुंब्रा येथील लोकल अपघाताने आता रेल्वे प्रशासनाने मोठा धडा घेतला आहे.
नव्या ट्रेनचा लूक नोव्हेंबर २०२५ रोजी तयार होणार असून प्रत्यक्षे सेवेत येण्यासाठी जानेवारी २०२६ रोजी रुळांवर धावू शकणार आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज चेन्नईतील इंटग्रेल फॅक्टरीला भेट दिली आहे. लोकल डब्यांच्या नव्या डिझाईनला मध्ये तीन महत्वाचे बदल होणार आहेत.
पहिला बदल म्हणजे दरवाजाला स्वयंचलित दरवाजे असतील, दुसरे म्हणजे कोच रुफ माऊंटेड व्हेन्टीलेशन युनिट असणार आहे. त्यामुळे डब्यात वरच्या भागातून हवा येणार आहे. तिसरा बदल म्हणजे कोचेसना एकमेकांमधून दुसऱ्या डब्यात जाण्यासाठी लांबपल्ल्यांच्या गाड्यांप्रमाणे व्हेस्टीब्युल गँगवे असणार आहे.
रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या सोबत काल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फोनवर संवाद साधला आहे. यावेळी मुंब्रा येथे झालेल्या अपघाताबाबत चर्चा करण्यात आली आहे.
यावेळी रेल्वेने याची दखल घेत लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची सूचना करण्यात आली. लोकलची फ्रिक्वेंसी वाढवाव्या याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी या घटनेबाबत दु:ख व्यक्त केले आहे.