बीडमध्ये ८४३ महिलांच्या काढल्या गर्भपिशव्या
1 min read
बीड दि.३:- बीड जिल्ह्यातून जवळपास दीड लाखाहून अधिक ऊसतोड मजुरांचे स्थलांतर होते. मात्र याच स्थलांतरा दरम्यान ८४३ ऊसतोड महिला कामगारांच्या गर्भपिशव्या काढल्याच्या धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या महिलांमध्ये ३० ते ३५ वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे. त्याचबरोबर १५२३ महिला गर्भवती असतानाही उसाच्या फडात काम करीत असल्याचे उघड झाले आहे.बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजूर दिवाळी दरम्यान महाराष्ट्रासह परराज्यात ऊस तोडणीसाठी जातात. सहा महिने ऊस तोडणी करून जानेवारी महिन्यापर्यंत त्यांचा परतीचा प्रवास असतो.
आरोग्य विभागाकडून ऊस तोडणीला जाण्यापूर्वी आणि आल्यावर त्यांचे आरोग्य तपासणी करण्यात येते.यादरम्यान जिल्ह्यातील ८४३ महिलांच्या गर्भपिशव्या काढल्याचे दिसून आले. प्रजनन आरोग्य पातळीवर सरकार याकडे लक्ष देत नाही. सरकारने यांना मानधन दिले पाहिजे अशी मागणी ऊसतोड कामगार संघटनेने केली आहे.
या महिलांनी गर्भपिशवी काढल्यानंतर अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे त्यांना मासिक पाळीत रक्तस्त्राव होणे, जंतुसंसर्ग, पोटात दुखणे अशा लक्षणांचा सामना करावा लागत आहे. बी-१२ आणि फॉलिक अॅसिडची कमतरता, थलसेमिया, मासिक पाळी,
शस्त्रक्रिया किंवा इतर कारणांमुळे रक्तस्राव झाल्यास रक्तक्षय होतो, असाच त्रास असणाऱ्या ऊसतोड महिलांची संख्या ३४१५ एवढी आहे. ११३२ गावांत महिला आरोग्य कृती दल कार्यरत असून, ४६२३१ महिलांची ऊसतोडीला जाताना तपासणी केली जात आहे, अशी माहिती बीडचे माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. सचिन शेकडे यांनी दिली.