राज्यात पावसाची विश्रांती;मान्सून मंदावला

1 min read

मुंबई दि.३१:- मान्सून दरवर्षीपेक्षा यावेळी खूपच लवकर दाखल झाला. वेगाने आलेला मान्सून मात्र आता मंदावला आहे. जूनचे पहिले दोन आठवडे मान्सून मंदावणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. पण हा पावसाला ब्रेक नसून उघडीप असल्याचे देखील स्पष्ट करण्यात आले. सध्या मुंबई-पुण्यासह अनेक जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली. उकाड्यामुळे घामाच्या धारा निघू लागल्या आहेत त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. आज राज्यातील काही भागातच हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे. तर विदर्भातील अनेक जिल्ह्यांना विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झोडपून काढणार आहे.हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, आज विदर्भातील अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. तर उर्वरित राज्यात पावसाची उघडिपी सुरू राहिल आणि तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यात पावसाचा जोर ओसरणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना मशागत आणि पेरणीसाठी उघडीप सापडणार आहे. ३१ मेपासून ते ३ जून दरम्यानच्या ४ दिवसांत मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित महाष्ट्रातील २९ जिल्ह्यात पूर्णतः नसला तरी पावसाचा जोर हळूहळू काहीसा ओसरू लागले. मुंबईसह संपूर्ण कोकणात पावसाचा जोर २ जूनपर्यंत कायम राहिल.तसंच, ‘३१ मे ते १० जून दरम्यानच्या ११-१२ दिवसांत मुंबईसह संपूर्ण कोकण वगळता उर्वरित महाष्ट्रातील २९ जिल्ह्यात, मान्सूनच्या त्याच्या पुढील वाटचालीला बाधा न येता ज्या ठिकाणी भरपूर पाऊस झाला त्याठिकाणी, वाफस्यावर पेरणी-पूर्व मशागत आणि खरीप पेरणीसाठी पावसाची काहीशी उघडीप मिळून शेतकामासाठी वेळ मिळू शकतो. ३ जून पासून मुंबईसह कोकणातही उघडीप मिळण्याची शक्यता आहे.’, असं माणिकराव खुळे म्हणाले. मान्सूनच्या सद्यस्थितीबद्दल माणिकराव खुळे यांनी सांगितले की, ‘३ दिवसांपूर्वी पुण्या-मुंबईत पोहोचलेला मान्सून सध्या त्याच्या वाटचालीत वातावरण अनुकूल असल्यामुळे तो आज अहमदनगर, बीड, धाराशिव, लातूर, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात तर विदर्भातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण भागापर्यंत पोहोचला आहे. पालघर, नाशिक, खान्देश, संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, आणि गोंदिया या जिल्ह्याकडे मान्सूनने अजूनही झेप घेतलेली नाही.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे