पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा आज जन्मदिवस

1 min read

पुणे दि.३१:- पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचा जन्मदिवस. जन्म.३१ मे १७२५ नगर जिल्ह्यातील चौंडी येथे. त्यांच्या वडिलांचे नाव मानकोजी शिंदे असे होते.इसवी सन 1733 मध्ये त्यांचा विवाह मल्हाराव होळकर यांचे चिरंजीव खंडेराव यांच्याशी झाला.होळकर घराण्यात गेल्यानंतर अहिल्याबाईंची ओळख कीर्तीशालिनी अशी झाली.त्यांना सासरी बाळबोध वाचन मोडी लिपी प्रशिक्षण आणि वाचन आणि योग्य ते शिक्षण देण्यात आले होते.मराठ्यांच्या इतिहासामध्ये आपल्या कर्तुत्वाने पराक्रमाने आणि बुद्धिमत्तेने उत्तर भारतामध्ये ठसा उमटविणारे आणि आजही स्वतःच्या कार्याचा वारसा चालू ठेवणारे होळकर हे घराणे इतिहास प्रसिद्ध आहे. या घराण्याने उत्तरेकडे राज्य विस्तार करून मध्य प्रदेशात स्वतंत्र संस्थान निर्माण केले. होळकर घराण्याचा मूळ पुरुष खंडूजी हे धनगर समाजातील असून ते शेतकरी होते. त्यांच्याकडे चौगुला हे वतन होते.प्रथम हे घराणे खेड तालुका म्हणजे विद्यमान राजगुरुनगर या तालुक्यातील वाफगाव या ठिकाणी वास्तव्यास होते. त्यांच्या घराण्यातील होळ मुरूम या ठिकाणचे मालीबा नावाचे कर्तबगार पुरुष होऊन गेले. त्यांच्या अकराव्या पिढीमध्ये खंडोजी तथा खंडोजी यांचा मुलगा मल्हाराव होळकर 1693 ते 1766 ही त्यांची कारकीर्द.याच काळात खऱ्या अर्थाने होळकर घराणे उदयास आले.पेशवा पहिला बाजीराव याने मल्हारराव यांना माळव्यामधील चौथाई व सरदेशमुखी वसुलीचे अधिकार दिले. आणि इसवी सन 1730 मध्ये माळव्याचा सुभेदार नेमले.
1730 ते 1766 या कालावधीत मराठी राजकारणाचा मल्हारावांनी उत्तरेमध्ये विस्तार केला. स्वतःच्या कार्याचा ठसा उमटवला. त्यांचे पुत्र खंडेराव 1723 ते 1754 ही त्यांची कारकीर्द. त्यांना 1740 मध्ये पेशवाईत शिलेदारीची वस्त्र मिळाली. दिनांक 17 मार्च 1754 रोजी कुंभेरीच्या लढाईत खंडेरावांचे निधन झाले. त्यावेळी सती जाण्याची प्रथा होती. मात्र मल्हार होळकर यांनी त्यावेळी पुरोगामी विचार करून अहिल्याबाईंनी सती जाऊ नये याविषयी गळ घातली तेव्हा व्यक्तिगत स्वार्थापेक्षा दौलतीचा सांभाळ आणि प्रजेचे हित महत्त्वाचे आहे हे जाणून त्या सती गेल्या नाहीत.अहिल्याबाई होळकर यांनी 27 मार्च 1767 पासून 1795 पर्यंत होळकर घराण्याची जबाबदारी सांभाळली. मराठय़ांच्या इतिहासात अनेक पराक्रमी सरदार होऊन गेले. त्यामधील होळकर घराण्यातील अहिल्याबाईंचे नाव आजही अनेकांच्या तोंडावर आहे. अहिल्याबाईंना ‘पुण्यश्लोक’ असेही म्हणतात. कारण त्यांनी केलेले सामाजिक कार्य आजही अनेकांसाठी आदर्शवत असेच ठरले आहे. राजे-रजवाड्यांचे इतिहास जगभर घडले आहेत. पुरुष-प्रधान प्रशासन व्यवस्थेमध्ये केवळ भारतातच नव्हे तर जगभर स्त्रीयांचे दमनच झाले असल्याचे आपल्याला दिसते. जगात राण्या-महाराण्या झाल्या असल्या तरी त्या शेवटी कर्तुत्वाने म्हणा की कोणा महाराजाची पत्नी होती म्हणुन म्हणा प्रसिद्ध आहेत पण त्या इतिहासावर स्वत:चा असा स्वतंत्र ठसा उमटवू शकलेल्या नाहीत. या जगात अपवाद असणारी एकमेव महाराणी म्हणजे अहिल्यादेवी होळकर. यात कसलीही अतिशयोक्ती नाही. होळकर घराण्याचा कट्टर शत्रू माल्कम आपल्या मध्यप्रदेशातील आठवणींत म्हणतो…” सर्व प्रकारच्या मर्यादा पेशव्यांपासून ते हिंदू सनातन्यांनी घातलेल्या असुनही अहिल्याबाईंनी ज्या पद्धतीने २८ वर्ष प्रजेच्या हिताचे उत्कृष्ठ प्रशासन केले. त्याला जगात तोड सापडणार नाही. माळव्यातीलच नव्हे तर जिथे तिचा प्रत्यक्ष कारभारही नव्हता अशा हिंदुस्थानातील सर्वच प्रजा तिला दैवी मानते. याचे कारण म्हणजे अहिल्याबाइंची प्रजानिष्ठा, आत्मशुद्धता आणि सर्व कल्याणासाठीची अविरत धडपड होय!”प्रख्यात इंग्रजी कवयत्री जोआना बेलीने तर अहिल्यादेवींवर नितांत सुंदर कविताच लिहिली. एक लक्षात घ्यायला हवे की एकोणिसाव्या शतकात युरोपात स्त्रीमुक्तीची जी चळवळ सुरु झाली तिला अहिल्यादेवींपासून प्रेरणा मिळाली. याचा आम्हाला अभिमान वाटायला हवा.मल्हारराव होळकर हे रत्नपारखी. मल्हाररावांची गाठ पोरसवदा अहिल्यादेवींशी पडली ती चक्क एका भांडणातुन. पण त्यांनी आपला पुत्र खंडेरावासाठी तिचा हात नि:संकोचपणे मागितला. खंडेराव होळकरांशी अहिल्यादेवींचा विवाह झाला. सासरा बनलेल्या मल्हाररावांनी आपल्या सुनेला हौसेने लिहा-वाचायला शिकवले. खंडेराव हे मल्हाररावांचे म्हणजेच मराठ्यांचे दिल्ली दरबारातील राजकीय मुत्सद्देगिरीला सांभाळत राज्यकारभारही पहात असत. मोहिमांतही भाग घेत. कुंभेरीच्या वेढ्याच्या बिकट प्रसंगी खंडेरावांचा तोफेचा गोळा लागुन मृत्यु झाला.अहिल्यादेवींनी तत्कालीन समाजव्यवस्थेला अनुसरुन सती जायची तयारी केली. त्या प्रसंगी मल्हाररावांनी जो विलाप केला तो वाचुन कोणाही सहृदय माणसाच्या डोळ्यांत पाणी आल्यावाचुन राहणार नाही. अहिल्यादेवींनी सती जायचा विचार रद्द केला.मध्ययुगामध्ये सती जाण्याची प्रथा होती. अहिल्याबाई यांनी तो विचार रद्द करून एका अर्थाने सती प्रथेच्या विरुद्ध क्रांतिकारी विचार मांडला. त्यांची ही कृती तत्कालीन समाजातील इतर महिलांसाठी आदर्श घालून देणारी आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे