तलावात पोहायला गेलेल्या चार विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू

1 min read

चाकण दि.१:- खेड तालुक्यातील चाकण शहरापासून जवळ असणाऱ्या कडाचीवाडी येथील पाझर तलावात पोहायला गेलेल्या चार शाळकरी मुलांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना शनिवारी (दि. ३१ मे) दुपारी दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास घडली.ओमकार हंगे, (मूळ रा. बीड), श्लोक मानकर (जि. अमरावती), प्रसाद देशमुख (जि. नांदेड), नैतिक मोरे (जि. अकोला) अशी बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. पोटाच्या उदरनिर्वाहसाठी आणि मुलांच्या शिक्षणासाठी या मुलांचे आई वडील राज्याच्या इतर जिल्ह्यातून मेदनकरवाडी (चाकण) या ठिकाणी आले होते. भाड्याने खोल्या घेऊन राहणाऱ्या चारही कुटुंबातील मुलांचा दुर्दैवी अंत झाल्याने होत्याचे नव्हते झाले आहे. दरम्यान, शनिवारी सकाळपासून मुले बाहेर गेली होती, दुपारपर्यंत मुले घरी न आल्याने मुलांच्या पालकांनी आजूबाजूला शोध घेतला असता. पाझर तलावाच्या काठावर या मुलांची चप्पल आढळून आल्याने मुले पाण्यात बुडाली की काय याचा शोध घेतला, त्यावेळी चारही मुलांचे मृतदेह मिळून आल्यावर पालकांनी एकच हंबरडा फोडला. मेदनकरवाडीचे माजी सरपंच महेंद्र मेदनकर, अमित मेदनकर आदींनी चाकण ग्रामीण रुग्णालयात भेटी देऊन नातेवाइकांचे सांत्वन केले. रात्री उशिरा विच्छेदन झाल्यानंतर मुलांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
Website Designed by JCS 8380826758.
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे