पावसाने स्वप्नांचा केला चुराडा; ३०० गोणी कांदे वाहून गेले; लेकीला चप्पल घेण्याचं आश्वासनही अपूर्ण; चिमुकलीच्या डोळ्यांत पाणी

1 min read

बीड दि.२६:- मागील काही दिवसांपासून राज्यात सर्वत्र अवकाळी पाऊस हजेरी लावताना दिसतोय. आज सकाळपासून मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरण बघायला मिळतंय. मान्सून देखील दाखल झाला आहे. यंदा वीस दिवस अगोदरच मॉन्सून राज्यात दाखल झाला. शेतकऱ्यांचे पेरणीचे काम शिल्लक आहेत. मुळात म्हणजे पाऊस सतत सुरू असल्याने शेतकऱ्यांना पेरणी अगोदरची कामे पूर्ण करण्यासही वेळ मिळाला नाहीये. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान देखील झालंय. अनेक शेतकऱ्यांच्या कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. बीडमध्ये मागील सहा दिवसापासून पाऊस हजेरी लावत आहे.आष्टी तालुक्यातील शिंदेवाडी येथील महेश बापू दरेकर यांनी तीन एक्करमध्ये कांद्याची लागवड केली होती. त्यांनी कांदा शेतात काढून ठेवला होता मार्केटमध्ये नेण्यासाठी मात्र गेली सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरु असल्याने महेश दरेकर यांच्या शेतातील जवळपास 300 गोणी कांदा अक्षरशः शेतात वाहून गेला. कांदयाचा चिखल झाला आहे. भर पावसात दरेकर कुटुंबातील चिमुकली अगदी सहा वर्षाची कांदा गोळा करत आहे. शेतकरी महेश दरेकर यांची मुलगी प्रगती हिला वाटतंय की, कांदा विकल्यावर माझे पप्पा मला चप्पल घेतील, शाळेची फिस भरतील पण आज महेश दरेकर यांच्या हातात कांद्याचे पैसे ऐण्याऐवजी फक्त कांद्याचा चिखलच आहे. चिमुकली प्रगती म्हणते की, मी आता शाळेत कशी जाणार, पप्पा माझी फि कशी भरणार तुम्हीच मदत करा साहेब…आमची पाच महिन्यांची मेहनत पाण्यात गेली. आमचे सर्व रस्ते बंद झालेत, मजूरांचे पैसे देणे बाकी आहे, उदया पेरणीचे दिवस आलेत खत बियाणे कुठून आणायची. मुलांची फि आहे, आज कांद्याचे पैसे हातात येण्याऐवजी कांद्याचा चिखलच आमच्या हातात आहे, अशी भावनिक साद चिमुकल्या प्रगतीची आई सोनाली दरेकर यांनी केली आहे. कांदे वाहून गेल्याने संपूर्ण कुटुंबियांच्या डोळ्यात पाणी आलंय. ८० हजार खर्च करत दरेकर कुटुंबियांनी कांद्याची लागवड केली होती. वरूण धो धो पाऊस सुरू असतानाही संपूर्ण कुटुंब चिखलात कांदा वेचत आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे