भारताची अर्थव्यवस्था जगात चौथ्या क्रमांकावर
1 min read
नवीदिल्ली दि.२६:- भारताने अखेर इतिहास घडवला आहे. अनेक संकटांवर मात करत भारतीय अर्थव्यवस्थेने जगातील चौथ्या क्रमांकावर मुसंडी मारलीय. अमेरिकेने भारताची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला. तरीही भारतीय अर्थव्यवस्थेने महासत्तांच्या स्पर्धेत जपानला मागे टाकत चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याचा बहुमान मिळवलाय. आता आपली अर्थव्यवस्था 4 ट्रिलियन डॉलर इतकी झाली आहे.जग मंदीशी, व्यापार युद्धाशी झुंजत असताना भारतीय अर्थव्यवस्थेसाठी ही मोठी बाब मानली जात आहे. नीती आयोगाचे सीईओ बी व्ही आर सुब्रह्मण्यम यांच्यानुसार भारताने अधिकृतपणे जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे.
नीती आयोगाच्या १० व्या गव्हर्निंग कौन्सिल बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. आपण ४ ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनलो आहोत. आज भारत जपानपेक्षा मोठा झाला आहे. फक्त अमेरिका, चीन आणि जर्मनी हे भारतापेक्षा मोठे आहेत. आपण जे नियोजन केले आहे.
आणि जे विचारात घेतले जात आहे त्यावर टिकून राहिलो तर अडीच ते तीन वर्षांत आपण तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनू, असा विश्वास सुब्रह्मण्यम यांनी व्यक्त केला. यावेळी सुब्रह्मण्यम यांनी आयएमएफच्या आकडेवारीचा हवाला दिला.
जपानच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम होण्यामागे अमेरिका आणि इतर देशांनी लादलेले शुल्क आणि व्यापारी धोरणे कारणीभूत आहेत. तर दुसरीकडे भारताची अर्थव्यस्था चौथ्या क्रमांकावर पोहचण्यामागे देशातील पायाभूत प्रकल्पात होणारी वाढती गुंतवणुक, कार्यक्षम तरुण लोकसंख्या,
IT आणि सेवा क्षेत्राचा झपाट्याने झालेला विकास अशा अनेक गोष्टी कारणीभूत आहेत. जर भारताचा विकास दर असाच राहिला तर भारत 2028 पर्यंत जर्मनीला मागे टाकून 4.9 ट्रिलियन डॉलर्सचा जीडीपी असणारी जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल.
त्यामुळे तंत्रज्ञान, उत्पादन आणि सेवांमध्ये नवीन नोकऱ्यांची संधी उपलब्ध होईल. तसेच गुंतवणुकीमुळे पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात सुधारणा होईल. त्यामुळे भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था होण्यासाठी कशाप्रकारे आगेकूच करतो, हे पाहणं महत्त्वाचं आहे.