६७ बैलगाडा आंदोलकांची निर्दोष मुक्तता; स्व. किसनराव बाणखेले, आढळराव पाटील यांचा समावेश
1 min read
मंचर दि.१९:- शेतकऱ्यांच्या आवडीचा खेळ असलेल्या बैलगाडा शर्यती सुरू होण्यासाठी मंचर येथे वीस वर्षांपूर्वी केलेल्या आंदोलनात माझ्यासह स्व. किसनराव बाणखेले आणि ६७ बैलगाडा मालकांवर गुन्हे दाखल झाले होते. त्या पार्श्वभूमीवर या खटल्याचा खेड न्यायालयात निकाल लागून माझ्यासह उर्वरित सर्वांची निर्दोष मुक्तता सबळ पुराव्या अभावी करण्यात आली. अशी माहिती पुणे म्हाडाचे अध्यक्ष आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.बंद असलेल्या बैलगाडा शर्यती पूर्ववत सुरू व्हाव्यात. या मागणीसाठी सन २००५ मध्ये मंचर (ता. आंबेगाव)
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात बैलगाडा मालक व शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात एकूण ६७जणांच्या विरोधात मंचर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. हा खटला सत्र न्यायालय सुरू होता. खेड सत्र न्यायालयाचे न्यायाधीश सय्यद यांनी शनिवारी (दि. १७) सबळ पुराव्याअभावी बैलगाडा आंदोलनाकांची निर्दोष मुक्तता केली आहे.
या पार्श्वभूमीवर लांडेवाडी येथे आढळराव पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे,मंचरचे माजी उपसरपंच सुनील बाणखेले, पंचायत समितीचे माजी सदस्य रवींद्र करंजखेले, शिवाजी राजगुरू आदी मान्यवर उपस्थित होते.
आढळराव पाटील म्हणाले, बैलगाडा मालक व शेतकऱ्यांनी माझ्यासह एकमेकांना पेढे भरून आनंद साजरा केला. बैलगाडा शर्यती सुरू व्हाव्यात, म्हणून अनेकदा मी लोकसभेत प्रश्न धसास लावला. तसेच अनेकदा आंदोलन केली. तीन खटले माझ्याविरोधात दाखल झाले. त्यापैकी एका खटल्यातूनमुक्तता झाली आहे.
६७ लोक एकावेळी न्यायालयात उपस्थित राहणे फार अवघड होते. त्यासाठी मी अनेकदा प्रयत्न केले. दाखल झालेल्यांपैकी १५ जणांचा मृत्यू झाला आहे. शनिवारी सर्व गुन्हा दाखल झालेल्यांची ओळखपत्र कोर्टाने घेतली. त्यानंतर कोटनि निकाल दिला. या कामी अॅड. मृणालिनी पडवळ, गणेश होनराव या कायदेतज्ञांचे विशेष सहकार्य लाभले.
त्यावेळी वळसे पाटील यांनी तुमच्या विरोधात कारवाई करा, असे सांगितले का? या प्रश्नाला उत्तर देताना आढळराव पाटील म्हणाले असे मला अजिबात वाटत नाही. माझ्या विरोधात गुन्हे पोलिसांनी व प्रशासनाने दाखल केले आहेत. माझ्या विरोधात गुन्हा दाखल असल्यामुळे पासपोर्ट मिळणे अवघड झाले होते. जवळपास साठवेळा मी अनेक बैलगाडा मालकांसह न्यायालयात हजर राहिलो. सध्या बैलगाडा शर्यतीला बाजारु स्वरूप आले आहे. उच्च न्यायालयाने व प्रशासनाने बैलगाडा शर्यतींना परवानगी दिली आहे. त्यासाठी अनेक निकष आहेत.
बैलगाडा शर्यतीच्या ठिकाणी रुग्णवाहिका व पशुवैद्यकीय अधिकारी असणे बंधनकारक आहे. तसेच देवाच्या यात्रेनिमित्त शर्यतीऐवजी वाढदिवसानिमित्त भरविल्या जातात. प्रशासन नियमाकडे दुर्लक्ष करत आहे. याबाबत जर पेटासारख्या संस्था पुन्हा कोर्टात गेल्या तर बैलगाडा शर्यती अडचणीत येऊ शकतात.