महाराष्ट्रात वेळेआधीच मान्सून धडकणार; मान्सूनच्या वाटचालीसाठी पोषक वातावरण

1 min read

मुंबई दि.१८:- मान्सूनने सध्या श्रीलंकेच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली आहे. तसेच बंगालच्या उपसागरात, मालदीव आणि कोमोरीन भागातही त्याने प्रगती केली आहे. दुसरीकडे, महाराष्ट्रात पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान निर्माण झालं असून, अनेक भागांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत काही ठिकाणी वादळी पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.मान्सूनच्या वाटचालीसाठी सध्या पोषक वातावरण असल्याची माहिती आहे. त्यामुळे सर्वसाधारण वेळेआधीच मानसून पडणार आहे. गुरूवारी मानसूनने दक्षिण अरबी समुद्रासह, मालदिव -भारत आणि श्रीलंकेच्या नजीक असलेल्या कोमोरिन भाग आणि दक्षिण किनारपट्टीपर्यंत मजल मारली होती. त्यांनतर मानसूनने एक दिवस तिथेच मुक्काम केला. नंतर त्याने हळूहळू आगेकूच केली. शनिवारी मानसूनने पुढे चाल करत दक्षिण अरबी समुद्रात, मालदीव, कोमोरिन भागात आणि बंगालच्या उपसागारातील काही भागात शिरकाव केला. तसेच मानसूनच्या ढगांनी अंदमान आणि निकोबार बेटाला पूर्ण व्यापलं. हवामान विभागाने पुढील २ दिवसांत मान्सून अरबी समुद्र, मालदीव, कोमोरीन आणि बंगालच्या उपसागरात आणखी भागांमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. या अनुषंगाने पूर्व-मध्य अरबी समुद्रात कर्नाटकच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. या वाऱ्यांमुळे गुरुवारपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणार असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, खानदेश, मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागांमध्ये काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच, ४० ते ६० किमी/तास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे