महाराष्ट्रात अवकाळीचा धुमाकूळ; ४ दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा
1 min read
मुंबई दि.१६:- महाराष्ट्रात मागील २४ तासांत मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस कोसळला. मराठवाड्यात ६० किमी प्रतितास वेगाने वादळी वारे वाहिल्याने अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली.
आज सकाळी मुंबई आणि उपनगरांत हलक्या पावसाने हजेरी लावली, तर ठाण्यात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबईसह राज्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर राज्यात पूर्व मौसमी वारे सुद्धा सक्रिय झाल्याने मे महिन्यातील उन्हाळा पावसाळ्यात बदलल्याचे दिसून येत आहे. मराठवाडा, कोकण, पश्चिम महाराष्ट्रात पूर्व मौसमी वाऱ्यांची सक्रियता दिसत आहे.
त्यामुळे मान्सून येण्यापूर्वीच पूर्व मौसमी पावसाची थाप राज्याच्या दारावर पडण्याची शक्यता आहे. यावेळी मान्सून लवकर धडकण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, घाट परिसर, अहिल्यानगर, पुणे, घाटमाथा, कोल्हापूर,
सातारा, सांगली, सोलापूर, अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना आजपासून पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
हवामान विभागाने ६० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. शेतकरी आणि नागरिकांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आणि छत्री बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत आज कमाल तापमान ३४ अंश सेल्सिअस आणि किमान तापमान २९ अंश सेल्सिअस राहील, तर वाऱ्यांचा वेग ३० किमी प्रतितास असेल. नवी मुंबईत आंशिक ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे. पालघरमध्येही यलो अलर्ट लागू असून, कमाल तापमान ३३ अंश आणि किमान २६अंश सेल्सिअस राहील.