पेमदरा व नळवणे गावात पाण्याची तीव्र टंचाई

1 min read

आणे दि.२९:- जुन्नरच्या पूर्व भागातील पठार भागावर असलेले आणे, नळवणे, आनंदवाडी, पेमदरा येथील जलसाठे कोरडे पडले आहेत. आणे पठारावर शिंदेवाडी,आणे, पेमदरा, नळवणे मोठी गावे असून त्यापैकी आणे व शिंदेवाडी गावात ८ दिवसांपूर्वी टँकर सुरू झाला आहे. परंतु नळवणे व पेमदरा गावांमध्ये टँकर मंजूर झाले आहे परंतु अद्याप टँकर सुरू झालेले नाहीत. त्यामुळे लवकर टँकर सुरू करण्याची मागणी येथील नागरिकांनी व गावच्या सरपंचांनी शासनाकडे केली आहे.या भागात विहिरी, कूपनलिका, तलावांतील पाणीसाठा अत्यल्प राहिला आहे. नदीवरील बंधारे तर फेब्रुवारी महिन्यातच कोरडे पडले आहेत. त्यामुळे नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची मोठी अडचण झाली आहे. दुसरीकडे चोळी मायनर तलावाच्या जीवावर तग धरून असलेली शेतीपिके करपून गेली आहेत. जनावरांचा चाराही मिळेनासा झाला आहे.आणे पठारावरील ओढे, नाले, तलाव, विहिरी आटल्याने पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. कमी पाण्यावरील पिकांकडे जुन्नरमधील शेतकरी वळले.जमिनीतील पाणीपातळी झपाट्याने कमी होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. दरम्यान, आगामी काळातील पाण्याचा तुटवडा लक्षात घेता, जुन्नरच्या पश्चिम व पूर्व भागातील शेतकरी कमी पाण्यावरील पिकांकडे वळला आहे.गेल्या सात-आठ वर्षांपासून पाऊसकाळ कधी कमी, तर कधी अधिक होत चालले आहे. यावर्षीचा पावसाळा चांगलाच झाला परंतु जमिनीला शोक जास्त असल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खालावत चालली आहे. गत महिन्यापासून विहिरीतील पाणीपातळी हळूहळू कमी झाली आहे. जंगली प्राण्यांना पिण्यासाठी पाणी सध्या कुठेही उपलब्ध नाही. पठारावर जनावरांच्या हिरव्या चाऱ्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. चोळीच्या बंधाऱ्यातील पाणी कमी झाल्याने काही दिवसातून एकदाच शेतकरी कृषी पंप चालवीत आहेत. नळवणे, सुरकुलवाडी व नवलेवाडी या ठिकाणी तातडीने टँकर सुरू करण्याची मागणी नळवण्याच्या सरपंच अर्चना उबाळे यांनी केली आहे. पंधरा दिवसांपूर्वीच याबाबतचे निवेदन गटविकास अधिकाऱ्यांकडे देण्यात आले आहे. या भागात हरीण, कोल्हे, माकड, तसेच बिबटे यांची संख्या अधिक आहे. त्यांच्यासाठी वन्यक्षेत्रामध्ये पाण्याची तळी उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.

चौकट १

[ तोपर्यंत पाण्यासाठी तारेवरची कसरत…….

दरम्यान, तालुक्याचे माजी आमदार अतुल बेनके यांनी गतवर्षी सरकारकडे पाठपुरावा करून ९८ कोटी रुपयांची येडगाव धरणाहून पठारभागापर्यंतच्या सर्व गावांसाठी नव्याने बेल्हे प्रादेशिक योजना मंजूर केली आहे. तिचे काम प्रगतिपथावर असून, भविष्यातील या सर्व गावांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. परंतु, त्यासाठी किमान एक, दोन वर्षे लागू शकतात; तोपर्यंत जनतेची पाण्यासाठी तारेवरची कसरत सुरूच रहाणार आहे.]

————–
प्रतिक्रिया

“शासनाने पाठपुरावा करून पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची सुविधा चालू केली आहे परंतु जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न सुद्धा गंभीर होत चालला आहे. “

प्रियांका प्रशांत दाते
सरपंच आणे—————-
प्रतिक्रिया

“पेमदरा गाव व वाड्यावस्त्यावर पाण्याची समस्या गंभीर निर्माण झाली आहे. गावातील बोअरवेल व विहिरींनी तळ गाठला असून शासनाने टँकर मंजूर केला आहे परंतु अद्याप गावात टँकर सुरू झालेला नाही.शासनाने लवकर टँकर सुरू करावा.”

जयश्री गाडेकर
सरपंच पेमदरा

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे