माळशेज घाटातील काचेचा स्कायवॉक उभारण्या बाबत अजित पवारांचा ‘हा’ निर्णय

1 min read

मुंबई दि.२८:- माळशेज घाटामध्ये काचेचा स्कायवॉक बांधण्यासंदर्भात सोमवार दि.२८ रोजी मंत्रालयात बैठक संपन्न झाली. माळशेज घाट हे ठाणे आणि पुणे जिल्ह्याच्या सीमेवर, कल्याण-नगर महामार्गावर वसलेलं पश्चिम घाटातील एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ आहे. या ठिकाणाचं पर्यटनदृष्ट्या महत्त्व लक्षात घेऊन माळशेज घाटातील महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विश्रामगृहाच्या शेजारील टेकडीवर रिकाम्या जागेत काचेचा स्कायवॉक उभारण्यात यावा. सार्वजनिक – खासगी भागीदारी तत्वावर या स्कायवॉकची उभारणी करण्यासाठी एक महिन्यात एकत्रित प्रस्ताव सादर करावा. असे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले.माळशेज घाट हा मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक आणि अहमदनगर या प्रमुख शहरांच्या जवळ आहे. तसंच घाटाजवळच शिवनेरी किल्ला, हरिश्चंद्रगड, विविध धबधबे, पिंपळगाव जोगा धरण इत्यादी पर्यटन स्थळं आहेत. त्यामुळे स्कायवॉक झाल्यास या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पर्यटक येतील आणि पर्यटनाला चालना मिळेल.या भागाच्या विकासासाठी पर्यटन विभागानं एकत्रित प्रस्ताव सादर करावा. सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग (राष्ट्रीय महामार्ग) यांनी या प्रकल्पाची आर्थिक व्यवहार्यता तपासून प्रस्ताव सादर करावा.स्काय वॉक प्रकल्प उभारताना त्यातून इको सेन्सिटिव्ह भाग वगळावा तसंच या प्रकल्पामध्ये वनविभागाचा अभिप्राय लक्षात घ्यावा, ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी वन विभागाला पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, अशा सूचना अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे