दहशतवादी हल्ल्यातील ६ मृत पर्यटकांच्या कुटुंबियांना महाराष्ट्र सरकारकडून ५ लाखांची आर्थिक मदत; महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना विशेष विमानाने आणणार:- देवेंद्र फडणवीस
1 min read
मुंबई दि.२३:- जम्मू-काश्मिरच्या पहलगाम येथे मंगळवारी दुपारी ४ वा. दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला. या गोळीबारामध्ये २६ पर्यटकांचा मृत्यू झाला.या मृत पर्यटकांमध्ये ६ पर्यटक हे महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातील या मृत पर्यटकांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने ५ लाखांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे.महाराष्ट्र सरकारने पहलगाम हल्ल्यातील मृतांना मदत जाहीर केली आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्वीट देखील केले आहे. ‘पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यात प्राण गमवावे लागलेल्या महाराष्ट्रातील एकूण ६ जणांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची आर्थिक मदत राज्य सरकारने जाहीर केली आहे.
तर, जखमींना ५०,००० रुपयांची मदत जाहीर केली आहे. महाराष्ट्रातील अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी एक विशेष विमान वापरण्यात येणार आहे आणि त्याचा खर्च राज्य सरकारतर्फे करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे.
यावेळी ते म्हणाले की, पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील ६ जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जिल्ह्यातील पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले आहेत. त्यांना तत्काळ महाराष्ट्रात आणण्याकरता सरकारकडून सर्वतोपरी मदत सुरू असून त्यांच्याशी संपर्क साधला जात आहे.
तसेच डोंबिवलीतील तीन मृतदेहांचे पार्थिव आज मुंबई विमानतळावर येणार असून दोन पार्थिव पुण्यात येणार आहेत. मुंबईत आशिष शेलार आणि मंगलप्रभात लोढा एअरपोर्टवर व्यवस्था पाहत आहेत. तर, पुण्यात खासदार मुरलीधर मोहोळ आणि माधुरी मिसाळ समन्वय साधत आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
ते पुढे म्हणाले की, पर्यटकांशी समन्वय साधून ज्यांनी संपर्क साधलाय त्यांची व्यवस्था केली आहे. काहींना इंडिगो विमानातून आणत आहोत. तसेच, उर्वरित पर्यटकांना आणण्याकरता इंडिगोला अतिरिक्त विमान पाठवण्याची विनंती करण्यात येणार आहे.
त्याकरता आवश्यक तिकिटांची व्यवस्था मंत्री मुरलीधर मोहोळ बघत आहेत. आपले पर्यटक सुरक्षित आहेत. ही घटना घडल्यामुळे घाबरल्याने त्यांना लवकरात लवकर महाराष्ट्रात आणण्यात येणार आहे, असेही त्यांनी म्हटले. पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून पाच लाखांची मदत देण्यात येणार आहे.
तसेच हल्ल्यात जखमी झालेल्यांवर जम्मू-काश्मीरमध्ये उपचार सुरु असून, त्यांना डॉक्टरांनी परमिट केल्यानंतर महाराष्ट्रात आणले जाईल, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
राज्याचे मंत्री गिरीश महाजन हे श्रीनगरसाठी रवाना झाले आहेत. ते त्याठिकाणी अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्याची व्यवस्था करणार आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री कार्यालयातून देण्यात आली आहे.