एसटी प्रवाशांना हॉटेल थांब्यांवरची दिली जाणारी सेवा चांगली नसल्यास ते थांबेच रद्द करा:- परिवहनमंत्री प्रताप सरनाईक
1 min read
मुंबई दि.१७:- एसटीच्या प्रवासादरम्यान एसटी बसला ठरवून दिलेले थांबे असतात. या थांब्यातील हॉटेलमध्ये बेचव आणि महाग जेवण प्रवाशांना दिले जाते. हे थांबे महिला प्रवाशांच्या दृष्टीने गैरसोयीचे देखील ठरतात. त्यामुळे अशा सर्व हॉटेल झाडाझडती होणार आहे. प्रवाशांना सकस आणि किफायतशीर जेवण मिळत नसेल तर अशा थांब्यांची तपासणी करुन ते रद्द करावेत, असे आदेश परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत.
लांब पल्ल्याच्या एसटी बस प्रवाशांच्या खाण्यापिण्यासाठी, जेवणासाठी महामार्गावर ठराविक ठिकाणच्या हॉटेलांवर थांबे घेतले जातात. मात्र, तेथील खाद्यपदार्थ बऱ्याचदा निकृष्ट दर्जाचे आणि जास्त किमतीचे असल्याचे आढळून आले आहे. अशा हॉटेल वा मोटेल थांब्यांवरची सेवा चांगली नसल्यास ते थांबेच रद्द करा, असे निर्देश परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान एसटी बस विविध हॉटेल-मोटेल थांब्यावर थांबतात. तेथे प्रवाशांना चहा-नाष्टा अथवा जेवण तसेच नैसर्गिक विधीसाठी वेळ दिला जातो.
परंतु अनेक हॉटेलमधील थांब्यांबाबत प्रवाशांच्या तक्रारी येत असून प्रामुख्याने प्रसाधनगृहे अस्वच्छ असणे, फराळाचे जिन्नस शिळे, अशुद्ध व महाग असणे, याचबरोबर संबंधित हॉटेल वरील कर्मचारी व मालकांची वर्तणूक एसटी प्रवाशांच्या सोबत अत्यंत वाईट असणे अशा प्रकारच्या तक्रारी समोर आल्या आहेत.
या तक्रारीची गंभीर दखल घेऊन मंत्री सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला याबाबत कडक धोरण स्वीकारण्याची निर्देश दिले आहेत. त्यामुळे आता प्रवाशांशी असभ्य वर्तन आणि बाकी गोष्टी लक्षात ठेवून त्या हॉटेलचे थांबे आता रद्द करण्यात येणार आहेत.
सध्या सुरू असलेल्या सर्व थांब्याचे सर्वेक्षण करून त्याचा अहवाल पुढील 15 दिवसांमध्ये सादर करण्याच्या सूचनाही परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांना केल्या आहेत.
कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता प्रवाशांच्या आरोग्याची कोणती तडजोड न करता संबंधित हॉटेल-मोटेल थांब्यावर कारवाई करावी असे स्पष्ट निर्देश सरनाईक यांनी दिले आहे. हॉटेल-मोटेल थांबे यावरून एसटीला मिळणारे उत्पन्न एक वेळ बुडाले तर चालेल,
परंतु प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा बाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही असंही प्रताप सरनाईक यांनी म्हटलं आहे. थांबे प्रवाशांना योग्य सुविधा देत नसतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि नव्या थांब्यांना मंजुरी द्यावी तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल येत्या 15 दिवसात आपल्याला सादर करावा असेही त्यांनी आदेशात म्हटले आहे.