एसटी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबतीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडगा काढला

1 min read

मुंबई दि.११:- लालपरी म्हणजे ग्रामीण भागाची जीवनवाहिनी. याच एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. एकूणच कर्मचाऱ्यांच्या मार्च महिन्याचे वेतन फक्त 56 टक्केच देण्यात आलं आहे. यामुळं घर चालवायचं तरी कसं? असा सवाल एसटी कर्मचारी आणि त्यांचे कुटुंबीय करीत होते. अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर तोडगा काढला आहे एसटी कर्मचाऱ्यांचा उर्वरित 44 टक्के पगार येत्या मंगळवारपर्यंत देण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यासाठी पुढाकार घेऊन वित्त सचिवांशी केलेल्या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन लवकरच अदा करण्याची त्यांनी तयारी दर्शवली आहे. एसटी कर्मचाऱ्यांना एप्रिल महिन्याचे फक्त 56 टक्के वेतन मिळाल्याचे वृत्त पसरल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली होती. आज सांगोला तालुक्याच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री शिंदे यांची काही एसटी कर्मचाऱ्यांनी भेट घेऊन आपले उर्वरित वेतन लवकरच देण्याची मागणी केली होती.या मागणीची तत्काळ दखल घेऊन या प्रश्नावर शिंदे यांनी राज्याचे वित्त सचिव ओमप्रकाश गुप्ता यांच्याशी फोनवरून चर्चा केली. या चर्चेअंती एसटी कर्मचाऱ्यांचे या महिन्याचे उर्वरित 44 टक्के वेतन येत्या मंगळवारपर्यंत अदा करण्यात येईल असे गुप्ता यांनी स्पष्ट केले. उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या पुढाकाराने एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा मिळाला असून त्यांच्यावरील वेतन कपातीचे संकट दूर होण्यास मदत झाली आहे. पगार रखडल्यानंतर राज्यातील एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या व्यथा होत्या.मुला बाळांचे शिक्षण, बँकांचे हप्ते, घर खर्च कसा भागवायचा काढायचा असा संतप्त सवाल एसटी कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबीयांकडून विचारला जात होता. कारण एसटी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्याचं फक्त 56 टक्के वेतन दिलं जाणार होतं. महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन भागवण्यासाठी दर महिन्याला सुमारे 277 कोटी रुपयांची आवश्यकता असते. मात्र राज्य सरकारकडून फक्त 272 कोटींचा निधी मिळाल्याने संकट निर्माण झालं आहे. त्यातच मिळालेल्या निधीपैकी 40 कोटी रुपये थेट एसटी बँकेकडे वळवण्यात आल्यामुळे कर्मचाऱ्यांना कमी वेतन मिळणार होतं. फक्त 56 टक्के पगार देण्यावरून एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली होती.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे