दुष्काळी शेती पाणीदार करण्यासाठी जलतारा प्रकल्प महत्त्वाचा:- डॉ.पुरुषोत्तम वायाळ
1 min read
बेल्हे दि.१०:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना,विद्यार्थी कल्याण मंडळ आणि ग्रीन क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ शैक्षणिक संकुल बेल्हे येथे जलतारा-पाणी परिषद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी जलतारा या अनोख्या प्रकल्पाचे निर्माते व लाखो शेतकऱ्यांची शेती पाणीदार करणारे जलदूत डॉ.श्री.पुरुषोत्तम वायाळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी उद्योजक बाळासाहेब गटकळ, इंटरनॅशनल असोसिएशन फॉर ह्यूमन व्हॅल्यू चे चीफ एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर अजय रस्तोगी,
रोहित गटकळ तसेच अणे, पेमदरा, नळावणे, बेल्हे, राजुरी या गावाहून मधुकर दाते, विनायक आहेर पांडुरंग गाडेकर, बाळासाहेब दाते, लक्ष्मण शिंदे, खंडू बेलकर, गोरक्षनाथ शिंदे, बाबाजी शिंदे, पांडुरंग गगे, मारुती शिंदे, एम.डी पाटील शिंदे, बाबुराव दाते, पाटिलबुवा गाडेकर, किरण आहेर आणि परिसरातून बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
मातीचा मुळ गुणधर्म पाणी धरून ठेवणं,साठवून ठेवणं हा आहे. मातीच्या या गुणांमुळे जमिनीत पिके घेतली जाऊ शकतात. परंतु या मातीच्या गुणधर्मामुळेच भुगर्भात पाण्याची पातळी सगळीकडे खुप खाली गेली शिवाय मोठ्या प्रमाणात पाण्याचा उपसा बोरवेल या नव्या तंत्राने होऊ लागला.
याचा परिणाम असा झालाय की वड,पिंपळ व चिंच या सारखे प्रंचंड मोठे वृक्ष जे २०० फुटांवरून पाणी मुळाद्वारे घेऊन वर्षानुवर्षे जगत होते ते मोठ्या प्रमाणात नामशेष होत गेले.त्याचा परिणाम वातावरणातील आर्द्रता व पावसावर मोठ्या प्रमाणात झालाय.
अतिशय आशावादी परिस्थिती निर्माण करण्याचं काम अमेरिकेतील श्री.मनू नंबुद्री व जालना येथील आर्ट ऑफ लिविंग चे टीचर डॅा.पुरुषोत्तम वायाळ यांनी संशोधन करून शास्रीय पद्धतीने भुगर्भातील पाणी पातळी वाढविण्याची क्रांती केलीय.डॅा.वायाळ सरांनी तर दोन लाख एकर भूक्षेत्र त्यांच्या प्रयोगाने पाण्याखाली आणून
वर्षभरात तीन पिकं घेउन शेतकरी सधन केलाय,की ज्या गावांमध्ये फेब्रुवारीत पिण्यासाठी टँकरची सोय करण्यात येत होती.तिथे शेतकरी आज वर्षभरात तीन पिकं घेतोय. गेल्या चार वर्षात २५० शेतकऱ्यांनी या प्रयोगाचा लाभ घेतलाय.
या प्रकल्पाचा आपल्या भागातील दुष्काळग्रस्त गावांना उपयोग व्हावा व बारमाही पाणी विना धरण विना पाट आपल्या स्वतःच्या बंद झालेल्या विहिरी भरण्यासाठी समर्थ शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त वल्लभ शेळके सरांनी पुढाकार घेऊन डॉ.पुरुषोत्तम वायाळ यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आपल्या परिसरातील शेतकऱ्यांसाठी आयोजित केले.
एकदा का भूगर्भातील पाण्याची पातळीत वाढ झाली की शेतीच्या व पर्यावरणाच्या समस्या सहज सुटतील हे या चार वर्षांच्या डॅा.वायाळ सर व त्यांच्या सहकार्यांनी सिध्द करून दाखविले आहे.काय आहे जलतारा प्रकल्प याविषयी बोलताना डॉ.पुरुषोत्तम वायाळ म्हणाले की,पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यावर एक एकर क्षेत्रामध्ये पाणी वाहत असताना.
एका कोपऱ्याला घेऊन थांबते त्या कोपऱ्याला चार फूट रुंद,चार फुट लांब व सहा फूट खोलीचा एक खड्डा केला जातो,ज्यामध्ये शेतकऱ्यांनी दगड भरून तो खड्डा बुजून टाकावा.पावसाळ्यात वाहून त्या एक एकर मध्ये आलेले सर्व पाणी त्या खड्ड्याच्या माध्यमातून जमिनीच्या भूगर्भामध्ये जाते.
असे प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात एक एकर मध्ये प्रत्येकी एक खड्डा असं गावभर जेवढे शिवार आहे त्या ठिकाणी शोष खड्ड्यात पाणी जिरवले जाते. उदाहरणार्थ, हजार एकर मध्ये १००० खड्डे करता येईल.त्यासाठी शेतकरी किंवा गावाच्या सहकार्यातून जेसीबी मशीन द्वारे हे खड्डे करून देण्याचा प्रयत्न करावा.
हा जलतारा प्रकल्प २०१२ पासून पाण्यावर काम सुरू आहे.महाराष्ट्रातही अनेक भागात पाण्याची समस्या असल्याने शासनाने अनेक योजना देखील राबवल्या आहेत. यात नदी पुनर्जीवन विहीर पुनर्भरण असेल मात्र या योजनांचा फारसा फायदा झालेला दिसून येत नाही.
म्हणूनच शेताचं पुनर्भरण करण्याची कल्पना सुचली. आणि त्यानुसार डॉ.वायाळ यांनी त्यांच्याच ५० एकरच्या क्षेत्रात ५० शोषखड्डे खोदले.त्यात लहान मोठे दगड टाकून पाणी जमिनी पुरवण्याचा प्रयोग करण्यात आला आणि हा प्रयोग यशस्वी देखील झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
शेतात असणारी दोन पावसात भरणारी विहीर एकाच पावसात भरू लागली.शिवाय भूगर्भातील पाणी पातळीत देखील वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.सद्यस्थितीत मागील चार वर्षापासून जलतारा प्रकल्पावर काम सुरू असून.
आत्तापर्यंत अनेक गावांमध्ये हा प्रकल्प यशस्वीपणे राबवण्यात आलेला आहे.पुढील कालावधीमध्ये हा प्रकल्प कार्यान्वित करण्याचा निर्धार यावेळी सर्व उपस्थित शेतकऱ्यांच्या वतीने करण्यात आला.