स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्यात; 2017 च्या प्रभाग रचनेनुसार मानस
1 min read
मुंबई दि.१:- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 2017 च्या प्रभाग रचनेनुसार करण्याचा राज्य सरकारचा मानस आहे.

मात्र या निवडणुकांसाठी तब्बल एक लाख ‘ईव्हीएम’ यंत्रांची आवश्यकता असल्यानं या निवडणुका दोन टप्प्यांत होण्याची शक्यता आहे.
राज्यातील 687 स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका गेल्या तीन ते पाच वर्षांपासून झालेल्या नाहीत. त्यामुळे बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांवर सध्या प्रशासक आहेत. निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाला तब्बल एक लाख ‘ईव्हीएम’ची आवश्यकता भासणार आहे.
मात्र आयोगाकडे सध्या 64 हजार ‘ईव्हीएम’ उपलब्ध आहेत. त्यामुळे उर्वरित ‘ईव्हीएम’साठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात येणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडील ‘ईव्हीएम’च्या मेमरीमध्ये मागील निवडणुकांची माहिती साठवलेली असते. या ‘ईव्हीएम’ मधील या मेमरीला व्हाइट मेमरी’ म्हटले जाते.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या ‘ईव्हीएम’मधील व्हाइट मेमरी’ कार्ड काढून नवीन कार्ड टाकून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येणे शक्य आहे. तशा दृष्टीने आयोगाचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. यावर आता मनसेनं सावध प्रतिक्रिया दिली आहे.
या महानगरपालिका निवडणुका प्रलंबित :
मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण – डोंबिवली, उल्हासनगर , भिवंडी-निजामपूर, वसई- विरार, मिरा-भाईंदर, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, संभाजीनगर, नांदेड, लातूर, परभणी
या जिल्हा परिषद निवडणुका प्रलंबित :
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड,
धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयानं 6 मे रोजी दिलेल्या निकालात प्रलंबित
निवडणुका आगामी 4 महिन्यात घेण्याबाबत राज्य निवडणूक आयोगाला स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे आता पुढील तीन महिन्यांत प्रभागरचना, आरक्षण सोडती पूर्ण करण्याला वेग येऊन निवडणुकांची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार आहे. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरळीत पार पाडण्याचं आव्हान निवडणूक आयोगासमोर असणार आहे.
