आधार कार्डअभावी रखडला १४ तास अंत्यविधी

1 min read

वेल्हे दि.२८:- पुणे शहरासारख्या स्मार्ट सिटीमध्ये आधारकार्ड नसल्याने एका व्यक्तीचा अंत्यविधी अनेक तास रखडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. खडकवासला परिसरातील कातकरी समाजातील 55 वर्षीय दत्ता बबन जाधव यांचा मृतदेह 14 तासांहून अधिक काळ अंत्यसंस्कारांअभावी पडून राहिला. आधारकार्डासारख्या मूलभूत कागदपत्राचा अभाव आणि सरकारी यंत्रणेची उदासीनता यामुळे ही परिस्थिती उद्भवल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.या बाबत सविस्तर माहिती अशी की, खडकवासला, सिंहगड भागांतील आदिवासी कातकरी समाजाला आधार कार्ड देण्याचे अभियान हवेली तालुका तहसील कार्यालयाने सुरू केले आहे. खडकवासला येथील आदिवासी कातकरी समाजाचे दत्ता बबन जाधव (वय ६५) यांच्याकडे आधारकार्ड नसल्याने त्यांचा अंत्यविधी १४ तास रखडला होता. त्याची दखल घेत. हवेली तहसील कार्यालयाने जिल्हाधिकारी डॉ. जितेंद्र डुडी व हवेली विभागाचे उपविभागीय अधिकारी डॉ. यशवंत माने यांच्या मार्गदर्शनाखाली हे अभियान सुरू केले.खडकवासला महसूल विभागाचे मंडळ अधिकारी हिंदूराव पोळ व तलाठी रवी फणसे यांनी वारजे येथील आधार केंद्रावर कातकरी समाजाच्या बालकांसह विद्यार्थी व इतरांची आधार नोंदणी करण्यासाठी शिबिराचे आयोजन केले होते. यामध्ये ५० हून अधिक आदिवासी कातकरी समाजाची मुले, नागरिक सहभागी झाले होते. आदिवासी बांधवांना ये जा करण्यासाठी तहसीलदार किरण सुरवसे यांनी स्वतः लक्ष घालून वाहनांचीही सोय केली होती. आवश्यक कागदपत्रे जमा करून ज्या आदिवासी कातकरी बांधवांना आधार कार्ड नाही त्या सर्वांना आधार कार्ड देण्यात येणार आहे.आदिवासी कातकरी समाजातील अनेक नागरिक, मुले, महिलांच्या जन्माची नोंद नाही, त्यामुळे त्यांना आधारकार्ड, रेशनकार्ड व इतर शासकीय योजनांचा लाभ मिळत नाही. खडकवासला येथे वृध्द आदिवासीच्या मृतदेहावर अंत्यविधी करण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया राबवावी लागली. अशी वेळ कोणावरही येऊ नये यासाठी पहिल्या टप्प्यात खडकवासला, सिंहगडसह तालुक्यातील आदिवासी कातकरी समाजाला आधारकार्ड काढून देण्यासाठी गावोगाव अभियान राबविण्यात येणार आहे, असे हवेली तालुका तहसीलदार किरण सुरवसे यांनी सांगितले.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे