धक्कादायक! बसला लागलेली आग अपघात नव्हे तर नियोजित कट; बसचालकानेच जाळून मारले चार कर्मचाऱ्यांना

1 min read

हिंजवडी (पुणे) दि.२१:- हिंजवडीतील ‘आयटी’ कंपनीतील कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या मिनी बसला आग लागून बुधवारी चौघांचा बळी गेल्याच्या दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. दिवाळीचा बोनस कापल्याच्या आणि मजुरांचे काम सांगितल्याच्या रागातून चालकानेच बस पेटवून चार कर्मचाऱ्यांना संपविल्याचे गुरुवारी स्पष्ट आले. जनार्दन हंबर्डीकर (वय ५७, रा. वारजे) या चालकास पोलिसांनी अटक केली असून, त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.हिंजवडीतील राजीव गांधी माहिती तंत्रज्ञान नगरीतील टप्पा दोनमधील व्योम ग्राफिक्स (तिरुमाला इंडस्ट्रिअल इस्टेट) कंपनीचे बारा कर्मचारी घेऊन बुधवारी सकाळी मिनी बस पुण्याहून हिंजवडी आयटी पार्ककडे निघाली होती. सकाळी आठच्या सुमारास चालक हंबर्डीकरच्या पायाखालील बाजूस आग लागली. त्यामुळे चालत्या बसबाहेर उड्या घेतल्याने चालकासह नऊ जण बचावले. मात्र, दरवाजा वेळेवर उघडला नसल्याने मागील बाजूस बसलेल्या चौघांचा होरपळून मृत्यू झाला. गुरुवारी सायंकाळी पोलिस उपायुक्त विशाल गायकवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक कन्हैया थोरात यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाचा खुलासा केला. हा अपघात नसून घातपात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. बसला आग कशामुळे लागली, याचा तपास पोलिसांनी सुरू केला. त्यावेळी शॉर्टसर्किटने ती लागली नसल्याचे दिसून आले. त्यामुळे कामगारांकडे आणि कंपनीत चौकशी केली. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. बसचालक जनार्दन हंबर्डीकर याचा बसमधील कर्मचाऱ्यांशी वाद होता. ते त्याला मजुरांचे काम सांगत. त्यामुळे दररोज बसमध्येही वाद होत असे. शिवाय दिवाळीमध्ये त्याला बोनस दिला नव्हता आणि वेतन कापले होते. त्या रागातून त्याने बस पेटवून दिली.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे