रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत रासेयो तील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन; तरुणांनी वेगावर नियंत्रण ठेवावे:पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंपळे
1 min read
बेल्हे दि.१७:- सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ राष्ट्रीय सेवा योजना व समर्थ कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट बेल्हे, समर्थ कॉलेज ऑफ कम्प्युटर सायन्स, समर्थ लॉ कॉलेज, समर्थ इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, समर्थ कॉलेज ऑफ फार्मसी बेल्हे यांच्या संयुक्त विद्यमाने राजुरी येथे विशेष हिवाळी श्रमसंस्कार शिबिरामध्ये नुकतेच रस्ता सुरक्षा अभियान संपन्न झाले.हे अभियान महामार्ग सुरक्षा पथक मदत केंद्र आळेफाटा यांच्यामार्फत आयोजित करण्यात आले होते.यावेळी पोलीस उपनिरीक्षक व महामार्ग सुरक्षा पथक प्रभारी अधिकारी अशोक पिंपळे, माजी सहाय्यक फौजदार संदेश निघोट, पोलीस हवालदार संदीप गाढवे, प्रशासकीय अधिकारी प्रा.प्रदीप गाडेकर,
राष्ट्रीय कार्यक्रम अधिकारी प्रा.भूषण दिघे,प्रा.दिनेश जाधव, प्रा.गणेश बोरचटे, प्रा.अश्विनी खटिंग,डॉ.सचिन भालेकर, प्रा.अजय भागवत, प्रा.सोमनाथ गाडेकर आणि रासेयो तील विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत मार्गदर्शन करताना पोलीस उपनिरीक्षक अशोक पिंपळे म्हणाले की, रस्त्यावर बरेचसे अपघात हे वाहतुकीचे नियम न पाळल्यामुळे होत असतात.
अपघातात मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींची आकडेवारी पाहता तरुण वयोगटातील बहुसंख्य असल्याचे दिसून येते. युवा वर्गात रस्ता सुरक्षा विषयाच्या अनुषंगाने जास्तीत जास्त जनजागृती होणे आवश्यक आहे. म्हणूनच महामार्ग पोलिसांनी महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांमध्ये रस्ता सुरक्षा जनजागृती चे काम हाती घेतलेले आहे.
तरुणांनी वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवावे. वेग कमी जीवनाची हमी असा मोलाचा सल्ला यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना दिला.आजचा विद्यार्थी उद्याचा चालक असल्याने त्यांच्यात जागृती झाल्यास भविष्यात अपघातांना आळा बसू शकतो.
शिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत असताना एक जबाबदार नागरिक बनावे. रस्त्यावर एखादा अपघात घडल्यास तात्काळ अपघात ग्रस्त व्यक्तींना मदत करण्यासाठी पुढाकार घ्यायला हवा. रस्ता सुरक्षा संदर्भात विद्यार्थ्यांनी ट्रिपल सीट गाडी चालवणे,
कट मारणे, वेग मर्यादा वाढवणे, वळणावर वेग वाढवणे, चार चाकी मध्ये सीट बेल्ट न लावणे यांसारख्या गोष्टी पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. बहुतांशी अपघात हे वेळेवर उपचार न मिळाल्याने होत असतात. म्हणूनच अपघात स्थळी जखमींना तात्काळ मदत ही केली गेली पाहिजे.
दुचाकी चालवताना हेल्मेट चा वापर केला पाहिजे. मद्य प्राशन करून वाहने चालवू नयेत. एक जबाबदार नागरिक म्हणून आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे की वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा आणि रस्ता अपघात टाळा असा संदेश अशोक पिंपळे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रदिप गाडेकर यांनी तर आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.दिनेश जाधव यांनी मानले.