खातेवाटप जाहीर होताच पालकमंत्री पदावरुन महायुतीत रस्सीखेच?

1 min read

छत्रपती संभाजीनगर दि.२२:- महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर खाते वाटप कधी जाहीर होणार? याकडे अनेकाचं लक्ष लागलं होतं. तसेच हिवाळी अधिवेशन हे बिनाखात्याच्या मंत्र्यांविना पार पडल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली. तसेच खाते वाटपासाठी एवढा वेळ का लागला? यावरून अनेकांनी प्रश्न उपस्थित केले. मात्र, यानंतर अखेर शनिवारी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर झालं आहे.यामध्ये गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवण्यात आलं आहे. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खातं देण्यात आलं आहे. दरम्यान, खातेवाटप झाल्यानंतर लगेचच महायुतीत पालकमंत्री पदावरुन रस्सीखेच सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. कारण शिवसेना शिंदे गटाचे नेते, तथा मंत्री संजय शिरसाट यांनी माध्यमांशी बोलताना छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच असणार, असा मोठा दावा केला आहे. संजय शिरसाट यांच्या या विधानानंतर खातेवाटप जाहीर होत नाही तोच आता महायुतीत पालकमंत्री पदावरुन महायुतीत रस्सीखेच सुरु झाल्याची चर्चा रंगली आहे.गेल्या ४० वर्षांपासून मी शिवसेनेचं काम करतोय. आज मला कष्टाचं फळ मिळालं. अनेक लोकांचे मोर्चे काढले. अनेकांचे निवडणुकीसाठी अर्ज भरले. पण आज त्याच चौकात माझं स्वागत होतंय, हा सर्वात मोठा आनंद आहे. आज माझे सर्व कार्यकर्ते खूष आहेत. मंत्रिपदाची संधी मला लोकांची सेवा करण्यासाठी मिळाली आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. दरम्यान, यावेळी छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री कोण होणार? याबाबत विचारलं असता छत्रपती संभाजीनगरचा पालकमंत्री मीच होणार आहे. मात्र, यासंदर्भातील औपचारीक घोषणा बाकी आहे, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर लगेचच आज राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे प्रवक्ते, आमदार संजय शिरसाट यांना सामाजिक न्याय हे खातं मिळालं आहे.

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
बातमी कॉपी करणे कायद्याने गुन्हा आहे