एसटीचा प्रवास महागणार? एसटी महामंडळाकडून शासनाकडे भाडेवाढीचा प्रस्ताव सादर?
1 min read
मुंबई दि.१:- महाराष्ट्रात निवडणुकीचे वारे संपले आहे. सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग आला असतानाच दुसरीकडे एसटीची भाडेवाढ होवून नागरिकांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागातील लोकांच्या प्रवासाचे साधन असलेल्या एसटी बसची भाडेवाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. याबाबतचा प्रस्तावदेखील एसटी महामंडळाकडून शासनाकडे सादर करण्यात आला आहे. साधारणतः १८ टक्क्यांनी ही भाडेवाढ करण्यात यावी, असा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आल्याचे बोलले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, एसटीच्या तिकीटदरांमध्ये मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, १०० रुपायांमागे १५ रुपये तिकीट वाढण्याची शक्यता आहे. मागील तीन वर्षांपासून एसटीच्या तिकीट दरांमध्ये कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही, असे सांगत एसटी महामंडळाकडून दरवाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आलाय.
एसटी महामंडळाने १४.१३ टक्के दरवाढीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एसटीच्या दरवाढीबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगण्यात येत आहे.एसटी महामंडळाचा १४ टक्के भाडेवाढीचा प्रस्ताव सरकारने स्वीकारल्यास १०० रुपयांच्या तिकीटामागे १५ रुपये अधिक मोजावे लागतील.
मिळालेल्या माहितीनुसार, उत्पन्नाच्या तुलनेत खर्च भागत नसल्यामुळे एसटीकडून दरवाढीचा प्रस्ताव पाठवण्यात आलाय. याआधी २७ नोव्हेंबर २०२१ रोजी तिकीटदरवाढ झाली होती. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर एसटी दरवाढीचा निर्णय घेणार का? याकडे लक्ष लागले आहे.
निवडणुकीपुर्वीच हा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. मात्र शिंदे सरकारच्या काळात हा प्रस्ताव राखून ठेवण्यात आला होता. त्यामुळे आता जर का नव्या सरकारने हा प्रस्ताव स्वीकारला तर प्रवाशांना एसटीतून प्रवास करताना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहेत. पण एसटी महामंडळाला होणाऱ्या तोट्यामुळे ही भाडेवाढ करणे गरजेचे असल्याचे म्हटले जात आहे.