आळंदीतील रिक्षाचालकाचा प्रामाणिकपणा; दीड लाखाचा ऐवज असलेली बॅग पत्ता शोधत केली परत
1 min read
आळंदी दि.१३:- येथील ज्येष्ठ पत्रकार व पार्ट टाइम व्यवसाय म्हणून रिक्षा चालवणारे महादेव पाखरे यांच्या रिक्षामध्ये (सोमवार दि.११) रात्री आठ वाजता दोघे पती-पत्नी आपल्या इच्छित स्थळी जाण्यासाठी पाखरे यांच्या रिक्षामध्ये बसले असता. छोटासा प्रवास संपल्यानंतर त्यांनी रिक्षामध्ये ठेवलेली बॅग त्यामध्ये असलेल्या किमती मौल्यवान वस्तू, (त्यामध्ये दोन मनी मंगळसूत्र, बांगड्या, कानातील फुले) शालेय साहित्य व इतर ऐवज मिळून सुमारे दीड लाखाचे दागिने सदरील बॅग मध्ये होते. परंतु ते घाई गडबडीत रिक्षातून उतरताना बॅग विसरून गेले.
ज्या ठिकाणी रिक्षा गल्लीमधून फिरली त्या ठिकाणची त्यांनी सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले असता, रात्र असल्याने रिक्षाचा नंबर त्यांना त्यामध्ये दिसू शकला नाही, त्यामुळे पुढील हालचाली सदरील पती-पत्नीने केल्या नाहीत, मात्र रिक्षा चालक महादेव पाखरे यांना रात्री आपल्या रिक्षामध्ये कोणाची तरी बॅग विसरल्याचे निदर्शनास आले असता.
सकाळी उठून पाखरे यांनी बॅग उघडली तर प्रथम त्यांना एमआयटी कॉलेज (लोहगाव) या संस्थेतील आयडी सापडला. त्यावरून पाखरे यांनी कॉलेजला लँडलाईन वरून संपर्क करून, सदरील व्यक्ती विषयी माहिती दिली. व त्यांना संपर्क करण्याचे सांगितले, त्यानंतर अर्ध्या तासात सदरील व्यक्तीचा मला फोन आला.
बॅग आमची आहे.त्यावर मी त्यांना सांगितले तुमचा सर्व ऐवज सुरक्षित ठिकाणी ठेवला आहे काळजी करू नका, दुपारी या व आपली बॅग घेऊन जा असे सांगितले. व सायंकाळी पाच वाजता देहू फाटा येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आळंदी शहराचे शहराध्यक्ष राहुल ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या समवेत सदरील बॅग गोविंद शिंदे,
पत्नी दिपाली गोविंद शिंदे व त्यांचे बंधू नारायण शिंदे यांचेकडे सुपूर्त केली. शिंदे कुटुंबाने पाखरे यांचे मनापासून आभार मानले, व तुमच्या सारख्या प्रामाणिक व्यक्ती समाजामध्ये अगदी बोटावर मोजण्या इतक्या पाहायला मिळतात असे शिंदे यांनी सांगितले. यावेळी राहुल ज्ञानेश्वर चव्हाण, माऊली घुंडरे, सुनील चाटे, सायरा शेख आदी उपस्थित होते.
पाखरे यांनी यापूर्वी देखील अनेक प्रवाशांच्या बॅगा, पर्स, मोबाईल, पाकिटे व इतर साहित्य असे जवळजवळ पंधरा वेळा वस्तु सापडलेल्या ज्याच्या त्याला परत केल्या आहेत, ते आपल्या रिक्षामध्ये अंध अपंगांना मोफत सेवा देतात, शिवाय विद्यार्थ्यांना 50% सवलतही देतात,” जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले,” या उक्तीनुसार त्यांची समाजसेवा सुरू आहे.