निकालाआधीच घडामोडींना वेग; महाविकास आघाडीची मुंबईत खलबतं; मातोश्री, सिल्वर ओकवर बैठकांचा सिलसिला
1 min read
मुंबई दि.२२:- विधानसभा निवडणुकीसाठीचं मतदान पार पडलं आहे. आता उद्या २३ नोव्हेंबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे. मतदारांचा कौल महायुती की महाविकास आघाडी कुणाच्या बाजूने लागणार याची उत्सुकता आता सर्वांनाच लागली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीने निकालाआधीच बैठका सुरु केल्या आहेत.महाविकास आघाडीला बहुमत मिळाल्यास राजकीय गणित असतील किंवा बहुमत नसल्यास काय राजकीय गणित असतील याबाबत सविस्तर आढावा गुरुवारी रात्री मातोश्रीवरील बैठकीत घेण्यात आला आहे. निकालात कुणालाच स्पष्ट बहुमत न मिळाल्यास महाविकास आघाडीच्या आमदारांना कसे संभाळायचे?
त्यांना कसे सुरक्षित ठिकाणी ठेवायचे? याबाबत या बैठकीत चर्चा झाली. आधी सायंकाळी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत, काँग्रसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रसचे नेते सतेज पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रस (शरद पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची मुंबईतील ग्रँड हयात हॅाटेलमध्ये महत्वाची बैठक पार पडली.
त्यानंतर सर्व नेत्यांनी मातोश्रीवर येत उद्धव ठाकरे यांच्याशीही याबाबत चर्चा केली. त्यानंतर जयंत पाटील सिल्वर ओकवर शरद पवार यांच्या भेटीला गेले होते. बाळासाहेब थोरात यांनी बैठकीनंतर बोलताना म्हटलं की, आमचं सरकार सहज बनत आहे.
यासाठी बैठकीत असा निर्णय झाला की निकालाच्या दिवशी आमचे सर्व इलेक्शन एजंट हे मतमोजणी केंद्रावरून संपूर्ण निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल पत्रावर सही झाल्यानंतर तिथून निघतील. आम्हाला कोणत्याही प्रकारची जुळवाजुळव करण्याची वेळ येणार नाही.
मुख्यमंत्री कोण होणार यापेक्षा युतीचे सरकार घालवणे आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. निकाल लागल्यानंतर आमचे सरकार बनल्यानंतर मुख्यमंत्री कोण यावर चर्चा होईल. सध्या महायुतीचे सरकार घालवणे हे जास्त महत्त्वाचे आहे.
आमदार फुटण्याची आम्हाला भीती नाही. सध्या कोणत्याही अपक्षांसोबत चर्चा नाही. सरकार बनल्यानंतर आम्हाला जे अपक्ष घेऊन मिळतील त्यांना आम्ही सोबत घेऊ, असंही बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं.