दूध गुणवत्तेसाठी दिवसातून दोन वेळा दूध संकलन आवश्यक:- जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया
1 min read
अहिल्यानगर, दि.१४:- जिल्ह्यात दूध गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी तसेच दूध व्यवसाय व प्रक्रिया व्यावसायिकांच्या व्यवसायात वृद्धीसाठी दिवसातून दोन वेळा दूध संकलन करणे आवश्यक आहे. संबंधित घटकांनी याबाबत तातडीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय प्रक्रिया व्यावसायिक यांच्या व्यवसाय वाढीसाठी उपाययोजना व अडचणींच्या दृष्टीने आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी डॉ. आशिया बोलत होते. बैठकीस जिल्हा उपायुक्त पशुसंवर्धन डॉ. उमेश पाटील, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी गिरीश सोनोने,
सहायक आयुक्त अन्न व औषध प्रशासन इंगळे, भोईटे, जिल्हा उद्योग अधिकारी अशोक बेनके, शेतकरी दूध प्रक्रिया असोसिएशनचे दीपक लांडगे उपस्थित होते.जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले, जिल्ह्यात दुधाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होत असून त्याची गुणवत्ता कायम राखली गेली पाहिजे,
तसेच सामान्यांना निर्भेळ दूध उपलब्ध झाले पाहिजे. दूध हे नाशवंत उत्पादन असल्याने त्याची वाहतूक, साठवणूक व वितरण करताना शीतकरणाची योग्य व्यवस्था न झाल्यास शेतकरी व व्यावसायिकांचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
दूध प्रक्रिया उद्योगांनी दूध संकलन केल्यानंतर बल्क मिल्क कूलरद्वारे योग्य तापमान राखून दूध दुग्धशाळेत पाठविण्याची व्यवस्था करावी. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार लक्षात घेता दिवसातून सकाळ व सायंकाळ अशा दोन वेळा दूध संकलन करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
पशुधन व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी दूध व दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती करणाऱ्या लहान व्यावसायिकांसाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात यावे. उत्पादन खर्च कमी होऊन स्वच्छ दूध निर्मितीसाठी पशुधनास संतुलित आहार देण्याबाबत पशुपालकांमध्ये प्रबोधन करण्यात यावे.
पशुपालकांमध्ये सर्व माध्यमांद्वारे व्यापक स्वरूपात जागृती करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकारी डॉ.आशिया यांनी यावेळी दिल्या.दूध व दुग्धजन्य पदार्थांची गुणवत्ता सुधारण्या साठी अन्न व औषध प्रशासन विभागाने नियमित तपासणी करावी. तसेच आवश्यकतेनुसार कारवाई करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
